वांद्र्यात भरधाव इनोव्हाने चिरडल्याने नऊ वर्षांचा मुलाचा मृत्यू,महिला चालकास अटक
एका भरधाव इनोव्हा कारने ८ ते ९ वर्षांच्या चिमुरड्याला चिरडल्याची अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी घटना मुंबईतील वांद्रे- पश्चिम येथे रविवारी दुपारी घडली आहे.यानंतर महिला चालकाला अटक झाली आहे.

एका भरधाव इनोव्हा कारने ८ ते ९ वर्षाच्या मुलाला चिरडल्याने त्या मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी सवा दोन वाजण्याच्या सुमारास वांद्रे येथील मेहबूब स्टुडिओ समोर घडली. या घटनेत कार चालक महिलेवर गुन्हा होऊन तिला अटक करण्यात आली आहे. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार ही महिला चालक कार चालवताना फोनवर बोलत असल्याने तिचे कारवरचे नियंत्रण चुकून तिने या मुलाच्या अंगावरुन कार नेली. कारचे चाक मुलाच्या छातीवरुन गेल्याने मुलगा अंश रवींद्र गुप्ता गंभीर जखमी झाला आणि त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषीत केले. या प्रकरणात कार चालक मेघना रावल हीला अटक करण्यात आली आहे.
वांद्रे येथील जॉन बॅप्टिस्ट रोडवर जिजामाता उद्यानासमोर ( मेहबूब स्टुडिओ परिसर) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास एका भरधाव इनोव्हा कारने अंश रवींद्र गुप्ता याला चिरडले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या अंश गुप्ता याचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर या भागात तणाव निर्माण झाला होता. कार चालक महिला मेघा रावल (वय ४५ ) या फिटनेस कोच आणि न्यूट्रिशनिस्ट आहेत. त्यांना वांद्रे पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे.
आरोपी मेघना रावल हीच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) आणि मोटर वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या अंश याला तातडीने जवळच्या हॉली फॅमिली रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.या अपघाती घटनेत आपला मुलगा गमवावा लागल्याने गुप्ता कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. संपूर्ण वांद्रे परिसरात या घटनेनंतर तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे.
डंपरला धडकल्याने दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
धावत्या स्कुटीची उभ्या डंपरला जोरदार धडक दिल्याने दोघा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना जळगावातील अमळनेर – गलवाडे रस्त्यावर पेट्रोल पंपाजवळ घडली. या अपघातात पंडित धाकू भिल ( ५० ) आणि नागो अमृत सपकाळे ( ४५ ) यांचा मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की दुचाकीवरील एकाचे शीर आणि हात धडापासून वेगळे झाले. भंडाऱ्याचा प्रसाद घेऊन परतताना दोघांवर काळाने घाला घातला असून दोघे रंजाणे येथील रहिवासी आहेत.
