श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची संधी हुकली! 303 चेंडूत टीम इंडियाचं गणित असं बिघडलं, जुनाच कित्ता पुन्हा गिरवला
IND vs SL Test Series: भारत श्रीलंका कसोटी मालिका नुकतीच पार पडली. या मालिकेत भारताने 1-0 ने विजय मिळवला. पण श्रीलंकेला क्लिन स्विप देण्याची मोठी संधी हातातून गमावली. भारतीय गोलंदाजांची जुनी खोड अंगलट आली आणि त्याचाच फटका बसला. नेमकं काय झालं? ते जाणून घ्या.

भारताने श्रीलंकेविरुद्धची कसोटी मालिका 1-0 ने आपल्या खिशात घातली. खरं तर ही मालिका भारत आरामात 2-0 ने जिंकू शकला असता. तशीच स्थितीच निर्माण झाली होती. पण दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळे क्लिन स्विप देण्याची मोठी संधी हातातून हुकली. दुसरा कसोटी सामना ड्रॉ होण्यासाठी भारतीय गोलंदाजांची जुनी खोड आणि कमकुवत बाजू यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे. गेल्या काही वर्षात भारतीय संघाकडून ही चूक वारंवार घडत आहे. यात विरोधी संघाच्या टेलेंडर्स म्हणजेच शेपटाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यास अडचण आली आहे. पुन्हा एकदा हीच चूक टीम इंडियाला महागात पडली आहे.
नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने 303 चेंडू खेळले
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत आघाडीच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांना यश आलं. पण शेपटाच्या फलंदाजांनी मात्र चांगलंच झुंजवलं. खासकरून नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजांनी भारतीय संघाला अडचणीत आणलं. संपूर्ण कसोटी मालिकेत भारतीय वेगवान गोलंदाज आणि फिरकीपटूंचा सामना करताना सलामीचे फलंदाज अपयशी ठरले. पण जेव्हा आठवी किंवा नववी विकेट पडते तेव्हा भारतीय गोलंदाजांची धार कमी होते, असं दिसून आलं. शेपटाचे फलंदाज असेच बाद होतील असा एक अविर्भाव असतो, असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दोन सामन्यात श्रीलंकेच्या सलामीवीरांनी एकूण 216 चेंडू खेळले. लाहिरू उदाराने दोन्ही सामन्यात ओपनिंग केली आणि 123 चेंडू खेळले. निशान मदुष्काने पहिल्या सामन्यात फक्त 29 चेंडू खेळले होते. तर कामिल मिशाराने कोलंबोत ओपनर म्हणून 64 चेंडू खेळले. पण श्रीलंकेच्या नवव्या आणि दहाव्या क्रमांकाच्या फलंदाजाने या मालिकेत एकूण 303 चेंडूंचा सामना केला.
भारतीय गोलंदाजांची जुनी खोड
कसोटी क्रिकेटमध्ये विरोधी संघाच्या सलामीच्या फलंदाजांना झटपट बाद करण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलं आहे. पण शेवटच्या दोन तीन विकेट घेणं डोकेदुखी ठरलं आहे. ही भारतीय गोलंदाजांची जुनी खोड असल्याचं अधोरेखित झालं आहे. कोलंबो कसोटीतही असंच पाहायला मिळालं. श्रीलंकेने 173 धावांवर 7 विकेट गमावले होते. पण तरी शेपटाच्या फलंदाजांनी 290 धावांपर्यंत मजल मारली. इतकंच काय तर श्रीलंकेला ऑलआऊट करण्यातही अपयश आलं. श्रीलंकेने दुसऱ्या डावात 9 विकेट गमवून 429 धावा केल्या. त्यामुळे सामना ड्रॉ करण्याशिवाय पर्याय नाही.