‘त्या’ कसोटी मालिकेचा ऐतिहासिक सन्मान, आयसीसीकडून ‘The Ultimate Test Series’ म्हणून निवड!

| Updated on: Jun 08, 2021 | 7:10 PM

आयसीसीने The Ultimate Test Series निवड करण्यासाठी 16 मालिकांची निवड केली होती. ज्यातील सर्वाधिक मते मिळालेली मालिका विजयी झाली आहे.

त्या कसोटी मालिकेचा ऐतिहासिक सन्मान, आयसीसीकडून The Ultimate Test Series म्हणून निवड!
the ultimate series
Follow us on

मुंबई : क्रिकेटमधील सर्वात जुना आणि मानाचा प्रकार म्हटलं तर कसोटी क्रिकेट. मात्र अलीकडे टी-20 च्या धमाकेदार फॉर्ममुळे कुठेतरी कसोटी क्रिकेटची लोकप्रियता कमी होताना दिसत होती. मात्र मागील काही वर्षांत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतर्गत झालेल्या अप्रतिम सामन्यांमुळे कसोटी क्रिकेटला पुन्हा ‘अच्छे दिन’ येत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातच आयसीसीने नुकतेच ‘The Ultimate Test Series’असा नवा सन्मान देत क्रिकेट इतिहासातील 16 अप्रतिम कसोटी मालिकांमधील एका मालिकेचा सन्मान केला आहे. (Indias Win Over Australia in Border Gavaskar Trophy Becomes The Ultimate Test Series Awarded by ICC)

भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेची आयसीसीने ‘The Ultimate Test Series’ म्हणून निवड केली आहे. ऑनलाइन मतदान प्रक्रियेच्या आधारे ही निवड करण्यात आली. भारतीय संघातील नवख्या खेळाडूंनी मिळवून दिलेल्या ऐतिहासिक विजयाला जगाने देखील मान्य केल्याचे यातून दिसून येत आहे. 2020 च्या अखेरीस सुरु झालेली ही मालिका 2021 च्या सुरुवातीपर्यंत चालली ज्यात रोमहर्षक सामन्यांत भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.

अशी झाली निवड

आयसीसीने The Ultimate Test Series ची निवड करण्यासाठी 16 कसोटी मालिकांना शॉर्टलिस्ट केलं होतं. ज्यात 1999 सालच्या ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज, 2005 च्या इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया अॅशेज सीरीज, 2008-09 मधील ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रीका इत्यादी मालिकांचा समावेश होता. ज्यात सर्वाधिक ऑनलाईन मत ही 2020-2021 मधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला मिळाली. ज्यामुळे या सिरीजचा The Ultimate Test Series म्हणून सन्मान करण्यात आला.

असा होता ‘तो’ ऐतिहासिक विजय

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी अंतर्गत भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची कसोटी मालिका पार पडली. ज्यात पहिल्या सामन्यात भारताला लजास्पद पराभव पत्करावा लागला. ज्यात भारताचा दुसरा डाव अवघ्या 36 धावांवर समेटला होता. 8 विकेट्सने पराभव पत्करल्यानंतर दुसऱ्या सामन्यात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडियाने कमबॅक करत 8 विकेट्सने विजय मिळवला. नंतर ऋषभ पंतच्या 97 धावांच्या जोरावर तिसरी मॅच ड्रॉ करण्यात भारत यशस्वी ठरला. अखेर चौथ्या आणि निर्णायक कसोटीत गाबाच्या मैदानात विजयासाठीच्या 328 धावांचा पाठलाग करताना शुभमन गिलच्या 91 धावांच्या सुरुवातीवर पंतने अखेर नाबाद 89 धावा करत विजय भारताच्या नावे केला.