
भारत ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघात कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यावर ऑस्ट्रेलियाने मजबूत पकड मिळवली आहे. एकंदरीत चित्र पाहता भारतीय संघ पराभवाच्या दरीत पडणार हे निश्चित झालं आहे. नाणेफेकीचा कौल गमावल्यानंतर भारताच्या वाटेला प्रथम फलंदाजी आली. भारताने पहिल्या डावात सर्व गडी गमवून 198 धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने 323 धावा केल्या. यासह ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 125 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढताना टीम इंडियाने नांगी टाकली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा निम्म्याहून अधिक संघ तंबूत होता. भारताने दुसऱ्या दिवस अखेर 6 गडी गमवून 105 धावा केल्या आहेत. अजूनही भारत पहिल्या डावातील आघाडी मोडून काढण्यात 20 धावांनी मागे आहे. तसेच हातात फक्त 4 विकेट आहेत. त्यामुळे तिसऱ्या दिवशीच भारताचा पराभव निश्चित असल्याचं दिसत आहे. दुसर्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा प्रतिका रावल नाबाद 43 आणि स्नेह राणा नाबाद 14 धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 125 धावांची आघाडी घेतली होती. खरं तर हे आव्हान मोडून काढणं डोकेदुखी होती. त्यात भारताच्या आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाले. स्मृती मंधाना दुसऱ्या डावातही काही खास करू शकली नाही. स्मृती मंधाना 2 चेंडूत 2 धावा करून डार्सी ब्राउनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाली. त्यानंतर शफाली वर्माही 5 धावा करून तंबूत परतली. प्रतिका रावलने एका बाजूने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या बाजूने तिला फलंदाजांची हवी तशी साथ मिळाली नाही. जेमिमा रॉड्रिग्स 14, कर्णधार हरमनप्रीत कौर 11, दीप्ती शर्मा 9 आणि ऋचा घोषला खातंही खोलता आलं नाही. लुसी हॅमिल्टनने 3, एनाबेल सुथरलँडने 2 आमि डार्सी ब्राउनने 1 विकेट काढली.
दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाकडून पहिल्या डावात एनाबेल सुथरलँडने जबरदस्त खेळी केली. तिने 171 चेंडूंचा सामना केला आणि 17 चौकारांच्या मदतीने 129 धावा केल्या. तिच्या झुंजार खेळीमुळे टीम इंडिया पिछाडीवर गेली. तर एलिस पेनीने 76 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही साजेशी कामगिरी करू शकला नाही. संघाला पहिल्या डावात 125 धावांची आघाडी मिळाली. भारताकडून पहिल्या डावात सायली सातघरेने 4, क्रांती गौडने 2, दीप्ती शर्माने 2, स्नेह राणाने 1 आणि शफाली वर्माने 1 विकेट काढली.