Manoj Jarange: माझा बळीच हवा असेल तर… मनोज जरांगेचा सरकारला पुन्हा उपोषणाचा इशारा… आता कुठं फिसकटलं?
Manoj Jarange Patil Hunger Strike: सरकारला माझा बळीच हवा असेल तर असे म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला पुन्हा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला. त्यांनी उपोषणाची तारीखही जाहीर केली. तोपर्यंत सरकारला मागण्या पूर्ण करण्यासाठी मुदत दिली आहे.

Manoj Jarange Patil Hunger Strike: मराठा समाजासाठी गेल्या मे महिन्याच्या अखेरीस मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी भरउन्हात आमरण उपोषण सुरू केले. त्यानंतर सरकारने तातडीने काही मागण्या पूर्ण केल्या. त्यानंतर एकापाठोपाठ सुखद धक्के दिले. ओबीसींप्रमाणे मराठा बांधवांना सवलती जाहीर केल्या. मराठा-कुणबी मंत्रालयाविषयी निर्णय घेतला. मराठा आंदोलनातील मृत्यूमूखी पडलेल्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत तर काहींना एमआयडीसीत नोकरीचे आश्वासन दिले. पण हा आनंद औटघटकेचा ठरला. शासन निर्णय होऊनही अधिकारी अडथळे आणत असल्याने मनोज जरांगे पाटील संतापले. आज अंतरवाली सराटीतून त्यांनी सरकारला पुन्हा उपोषणाला बसण्याचा इशारा दिला. यावेळी सरकारचे प्रतिनिधी आमदार प्रसाद लाड यांच्यासह काही अधिकारी उपस्थित होते.
29 ऑगस्ट रोजी बेमुदत उपोषण
सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती जाहीर केल्या. त्याचा जीआरही काढला. पण अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नसल्याचा संताप मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. अधिकारी हेच अंमलबजावणीत अडथळा आणत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. कुणबी दाखले मिळवण्यासाठी आजही कसरत करावी लागत असल्याचे गऱ्हाणे त्यांनी मांडले. तहसलीदार व इतर अधिकारी अडवणूक करत असल्याचे म्हणणे त्यांनी मांडले. मराठा आणि कुणबी मंत्रालयाची मागणी केली. तर दोन ओबीसी मंत्र्यांचा त्यासाठी किती विरोध सुरू आहे, असा त्रागा जरांगेंनी व्यक्त केला. मराठा समाजावर ही मंडळी का जळत आहे? पण मराठ्यांना अधिकार नाहीत का? असा सवाल त्यांनी केला.
पश्चिम महाराष्ट्रात कराड येथे 35 हजार नोंदी आहेत, पण त्या रोखण्यात आल्या. मराठवाड्यातही तशीच स्थिती आहे. लातूर येथील चाकूर येथील समाज बांधवांच्या कुणबी नोंदी अडवून ठेवल्या आहेत. मोडी लिपीच्या कुणबी नोंदी आहेत. तहसीलदार, जिल्हाधिकारी काय करत आहे. ओबीसींचे आरक्षण काढून आम्हाला काही नको. पण कागदपत्रे असताना का अडवणूक करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी अपलोड केलेल्या नोंदी उडवायला लावल्याचा आरोप जरांगेंनी केला. मराठा-कुणबी मंत्रालय लवकर स्थापन करण्याची मागणी त्यांनी केली. यासह इतर मागण्या सरकारने एकदाच पूर्ण कराव्यात. आता वारंवार तोच विषय सांगून, त्याच्या मागे लागून त्या पूर्ण करायला लावू नका. येत्या 29 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या आंदोलनाच्या लढ्याला तीन वर्षे पूर्ण होत आहे. तोपर्यंत प्रलंबित सर्व मागण्या पूर्ण कराव्यात नाहीतर 29 ऑगस्ट रोजी पुन्हा उपोषणाला बसणार असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
राज्यात ४० हजारांच्या वर गाव, वस्ती, वाड्या आहेत. आमच्याकडे ५३ हजार मराठा सेवक आहेत. त्यांनी तात्काळ आम्हाला याविषयीची माहिती दिली आहे. याविषयीचे आदेश सरकारच्या सर्व विभागांना द्यावे लागतील. या शैक्षणिक वर्षातच त्याची अंमलबजावणी व्हायला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. तर आमदार प्रसाद लाड यांनी लवकरात लवकर मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
