IPL 2021 मधून भारतीय क्रिकेटला मिळाले 5 मौल्यवान हिरे, फलंदाज, गोलंदाजासह अष्टपैलू खेळाडूंचाही समावेश
आयपीएलचं 14 वं पर्व अखेर पार पडलं. अंतिम सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला मात देत विजय मिळवला. पण या पर्वाने भारतीय क्रिकेटला मात्र काही अप्रतिम खेळाडू दिले.

आयपीएल 2021 चं पर्व अखेर संपलं. चेन्नई सुपर किंग्सने अंतिम सामना जिंकत ट्रॉफीवर नाव कोरलं. दरम्यान चेन्नईच्या विजयात कर्णधार धोनी एवढाच वाटा युवा खेळाडू ऋतुराज याचाही असून त्याने संपूर्ण पर्वात अप्रतिम कामगिरी केली. संपूर्ण पर्वात भारतीय खेळाडूंचा दबदबा दिसून आला. दरम्यान या पर्वाने ऋतुराजसारखे आणखी काही धाकड युवा खेळाडूही भारतीय क्रिकेटला दिले.

आयपीएल 2021 ने भारतीय क्रिकेटला दिलेल्या धाकड खेळाडूंमध्ये सर्वात पहिलं नाव तर ऋतुराज याचच येतं. त्याने यंदा अप्रतिम खेळी करत ऑरेंज कॅपसह इमर्जिंग प्लेयरचा खिताबही मिळवला. त्याने 16 सामन्यात 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 635 धावा नावे केल्या.

ऋतुराजसह आणखी एका युवा खेळाडूवर पुरस्करांचा वर्षाव झाला. तो म्हणजे आरसीबीचा हर्षल पटेल. हर्षलने सर्वाधिक विकेट्स घेत पर्पल कॅपतर जिंकलीच सोबतच मोस्ट वॅल्युएबल प्लेयर अर्थात मालिकावीराचा पुरस्कारही मिळवला. त्याने एकूण 32 विकेट्स घेतल्या.

हर्षलसह आणखी एक गोलंदाज यंदा चमकला तो म्हणजे दिल्ली कॅपिटल्सचा आवेश खान. त्याने त्याच्यात संघातील कगिसो रबाडा, एनरिक नॉर्खिया सारख्या दिग्गजांना मागे टाकत 16 सामन्यात 24 विकेट्स नावे केल्या.

या सर्वांसोबत युएईच्या दुसऱ्या पर्वात खेळण्यास सुरुवात केलेल्या केकेआरच्या व्यंकटेश अय्यरनेही साऱ्यांची मनं जिंकली. त्याने धमाकेदार खेळी करत 10 सामन्यात 370 धावा करत 3 विकेट्सही घेतल्या.

यंदाच्या आयपीएलमधून आणखी एक उत्तम गोलंदाज भारतीय क्रिकेटला मिळाल तो म्हणजे पंजाब किंग्सचा अर्शदीप सिंग. त्याने 12 सामन्यात 18 विकेट्स घेतल्या.