मुंबई: IPL 2022 मध्ये लीग स्टेज संपली असून आता प्लेऑफचे (playoff) सामने सुरु झाले आहेत. पहिल्या क्वालिफायर सामन्यात (Qualifier Matches) विजय मिळून गुजरात टायटन्सचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. फायनलमध्ये पोहोचणारा दुसरा संघ कुठला असेल? याचा निर्णय शुक्रवारी होईल. लीगच्या एलिमिनेटरमध्ये रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा सामना लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध होणार आहे. पहिल्या क्वालिफायरप्रमाणे हा सामना सुद्धा कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार आहे. कोलकातामध्ये मागच्या काही दिवसांपासून पाऊस सुरु आहे. अशावेळी तिथे सामने आयोजित करण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. पावसाची शक्यता लक्षात घेऊन बीसीसीआयने प्लेऑफसाठी काही नवीन नियम बनवले. त्याची माहिती सुद्धा दिली आहे. कालच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणेल, असा हवामान विभागाचा अंदाज होता. पण सुदैवाने असं घडलं नाही.
आजचा सामना RCB आणि LSG दोन्ही संघांसाठी महत्त्वाचा आहे. जो संघ हरेल, त्यांचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. हवामान विभागाने आजच्या सामन्यात पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज वर्तवला आहे. वातावरण स्वच्छ असेल, पाऊस व्यत्यय आणणार नाही, असा अंदाज आहे. तापमान 27 डिग्री ते 36 पर्यंत असेल.
पावसाने व्यत्यय आणला आणि नियमित वेळेत सामना सुरु होऊ शकला नाही, तर विजेता सुपरओव्हरमधून ठरवला जाईल. एका षटकाचा खेळही शक्य झाला नाही, तर पॉइंट्स टेबलमध्ये कुठला संघ टॉपवर आहे, त्या आधारावर निकाल लावला जाईल. क्वालिफायर 1, एलिमिनेटर आणि क्वालिफायर 2 साठी कुठलाही रिझर्व्ह दिवस ठेवलेला नाही. फायनलसाठी मात्र पावसाने बाधा आणली, तर एक रिझर्व्ह दिवस आहे. 30 मे हा फायनलसाठी राखीव दिवस आहे. रात्री आठवाजता सामना सुरु होईल.