मुंबई: आयपीएल 2022 (IPL 2022) साठी फ्रेंचायजींनी रिटेंशन लिस्ट प्रसिद्ध केली, त्यावेळी क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला होता. कारण काही अपेक्षित नावं त्या यादीत नव्हती. खासकरुन केएल राहुलचं नाव नसल्याने अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. केएल राहुल पंजाब किंग्सचा (Punjab Kings) कॅप्टन होता. त्याचं पंजाबच्या टीम बरोबर एक वेगळं नातं होतं. राहुलचं (KL Rahul) नाव पंजाबच्या रिटेंशन लिस्टमध्ये नसल्यामुळे तो आता पंजाबची साथ सोडणार अशी चर्चा सुरु झाली होती. खुद्द स्वत: राहुलनेच पंजाब किंग्सकडून न खेळण्याचा निर्णय घेतला होता. यंदाच्या सीजनमध्ये केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्सच नेतृत्व करताना दिसणार आहे. लखनऊच्या टीमने मेगा ऑक्शनआधीच त्याला आपल्या ताफ्यात घेतलं होतं. राहुलने आता पंजाब किंग्सची साथ का सोडली? त्याचा खुलासा केला आहे.
कॅप्टन म्हणून खोऱ्याने धावा केल्या, पण….
रविचंद्रन अश्विन गेल्यानंतर केएल राहुलने दोन सीजनपर्यंत पंजाब किंग्सचं नेतृत्व केलं. कॅप्टन असतानाही त्याने पंजाबसाठी खोऱ्याने धावा केल्या. राहुलने त्याच्या कॅप्टनशिपने विशेष असं प्रभावित केलं नाही व संघाला प्लेऑफमध्येही घेऊन जाऊ शकला नाही. असं असलं तरी राहुलने कर्णधारपदी कायम रहावं, अशी पंजाब किंग्सची इच्छा होती. पण राहुलने संघाची साथ सोडण्याचा निर्णय घेतला.
संघाची साथ सोडण्याचा निर्णय कठीण होता
पंजाब किंग्समधून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं, खूप कठीण होतं. पण आपण अजून काय मिळवू शकतो? हे जाणून घेण्यासाठी त्याने हे पाऊल उचललं. “मी चार वर्ष पंजाब किंग्सकडून खेळलो. खूप चांगला वेळ मी घालवला. मी अजून काय-काय मिळवू शकतो. मी नवीन प्रवास सुरु करु शकतो का? निश्चित माझ्यासाठी हा खूप कठीण निर्णय होता. मी पंजाब संघा बरोबर बराच काळ होतो. मी अजून काही करु शकतो का? हे मला पहायचं होतं, म्हणून मी हा निर्णय घेतला” असं राहुल म्हणाला.
अनिल कुंबळेला का वाटतं होतं, की राहुलने पंजाबमध्येच रहावं?
राहुलने पंजाबमध्येच रहावं, अशी आमची इच्छा होती. पण त्याने लिलावामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला, असं टीमचे हेड कोच अनिल कुंबळे त्यावेळी स्टार स्पोर्ट्सवर म्हणाले होते. “आम्हाला राहुलला रिटेन करायचं होतं. म्हणून दोन वर्षांपूर्वी आम्ही त्याची कर्णधारपदी निवड केली होती. पण त्याने लिलावामध्ये उतरण्याचा निर्णय घेतला. आम्ही त्याच्या निर्णयाचा सम्मान करतो. तो खेळाडूचा निर्णय असतो” असे कुंबळे म्हणाले. या सीजनमध्ये मयंक अग्रवाल पंजाबचं कर्णधारपद भूषवणार आहे. फ्रेंचायजीने राहुल आणि अर्शदीप सिंहला रिटेन केलं.