
श्रेयस अय्यर याच्या नेतृत्वात कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या 17 व्या मोसमातील सहावा विजय मिळवला. कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिट्ल्स विरुद्ध 7 विकेट्सने धमाकेदार विजयाची नोंद केली. कोलकाताने 154 धावांचा पाठलाग 3 विकेट्स गमावून 16.3 ओव्हरमध्ये पूर्ण केला. कोलकाताने 21 बॉलआधी 157 धावा केल्या. कोलकातासाठी फिलीप सॉल्ट याने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. तर त्याआधी दिल्लीकडून आठव्या स्थानी आलेल्या कुलदीप यादव याने नाबाद 35 धावांची खेळी केली. त्यामुळे दिल्लीला 153 धावांपर्यंत मजल मारता आली. दिल्लीची बॅटिंग फ्लॉप ठरली. दिल्लीच्या टॉप ऑर्डरने सपशेल निराशा केली. तर मिडल ऑर्डरमध्ये कॅप्टन ऋषभ पंतच्या 27 धावांचा अपवाद वगळता एकालाही खास काही करता आलं नाही. दिल्लीच्या या पराभवानंतर ऋषभ पंतने काय म्हटलं? हे जाणून घेऊयात.
ऋषभ पंतने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणं योग्य असल्याचं म्हटलं. मात्र आम्ही 20-30 धावा करण्यात कमी पडल्याचं पंतने मान्य केलं. 180 धावा केल्या असत्या तर आमच्या गोलंदाजांना लढता आलं असतं, मात्र आम्ही तसं करण्यात अपयशी ठरल्याचं पंतने नमूद केलं. पंतने आणखी काय काय म्हटलं हे समजून घेऊयात.
“पहिले बॅटिंग करणं हा चांगला पर्याय होता. आम्ही आदर्श बॅटिंग करु शकलो नाहीत. आपण आपल्या चुकांमधून शिकत असतो. प्रत्येक दिवस हा आपलाच नसतो”, असं पंतने म्हटलं. तसेच पंतच्या नेतृत्वाच दिल्लीने गेल्या 5 पैकी 4 सामने जिंकून जोरदार कमबॅक केलं होतं. याबाबतही पंतने प्रतिक्रिया दिली.
“आम्ही एक टीम म्हणून जशी वाटचाल केली ते छान होतं. मात्र हा टी 20 चा खेळ आहे. 180-210 च्या आसपास कोणतीही धावसंख्या चांगली ठरली असती. मात्र आम्ही आमच्या गोलंदाजांना डिफेंड करण्यासाठी कोलकाताला मोठं आव्हान देऊ शकलो नाहीत”, असं पंतने मान्य केलं.
कोलकाता नाईट रायडर्स प्लेइंग ईलेव्हन : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (विकेटकीपर), सुनील नरेन, व्यंकटेश अय्यर, आंद्रे रसेल, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, हर्षित राणा आणि वरुण चक्रवर्ती.
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग ईलेव्हन : ऋषभ पंत (कॅप्टन आणि विकेटकीपर), पृथ्वी शॉ, जेक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, शाई होप, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रसिक दार सलाम, लिझाद विल्यम्स आणि खलील अहमद.