IPL 2024, MI vs CSK : चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजयाचं श्रेय या खेळाडूला दिलं, सामन्यानंतर म्हणाला…
आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सामना रंगला. या सामन्यात चेन्नईने मुंबईला 20 धावांनी मात दिली. या विजयासह चेन्नईने प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तर मुंबईची पुढची वाट खडतर झाली आहे. या सामन्यातील विजयानंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडने या खेळाडूंचं तोंडभरून कौतुक केलं.
![IPL 2024, MI vs CSK : चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजयाचं श्रेय या खेळाडूला दिलं, सामन्यानंतर म्हणाला... IPL 2024, MI vs CSK : चेन्नईचा कर्णधार ऋतुराज गायकवाडने विजयाचं श्रेय या खेळाडूला दिलं, सामन्यानंतर म्हणाला...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/Ruturaj_Gaikwad-26.jpg?w=1280)
आयपीएल 2024 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्सने मुंबई इंडियन्सला वानखेडेवर 20 धावांनी मात दिली. प्रथम फलंदाजी वाटेला येऊनही मुंबईला पराभवाचं पाणी पाजलं. चेन्नई सुपर किंग्सने 20 षटकात 4 गडी गमवून 206 धावा केल्या आणि विजयासाठी 207 धावांचं आव्हान दिलं होतं. खरं तर या सामन्यात विजयाचा शिल्पकार मथीशा पथिराना ठरला. पण या सामन्याच्या विजयाची स्क्रिप्ट पहिल्या डावातील शेवटच्या चार चेंडूवर लिहिली गेली होती. थलायवा महेंद्रसिंह धोनी शेवटचे चार चेंडू खेळण्यासाठी मैदानात उतरला आणि हार्दिक पांड्याची धुलाई केली. सलग तीन षटकार ठोकले आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा घेतल्या. याच त्या 20 धावा मुंबई इंडियन्सला महागात पडल्या. या सामन्यातील विजयानंतर चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याने मनमोकळेपणाने याबाबत सांगितलं. तसेच विजयाचा खरा शिल्पकार तेही उघडपणे बोलला.
“आमचा सर्वात तरूण विकेटकीपरचे तीन षटकारांनी आमची खूप मदत झाली. तोच फरक विजयात दिसून आला आहे. आम्हाला या मैदानावर 10-15 रन्सची आवश्यकता होती. मधली काही षटकं बुमराहाने जबरदस्त टाकली. त्यांनी खूपच चांगली फटकेबाजी केली पण आम्ही गोलंदाजीत पकड सोडली नाही. या मैदानात तुम्हाला बॉलिंग आणि फलंदाजीत सारखीच कामगिरी करावी लागते. आमचा छोट्या मलिंगाने चांगली गोलंदाजी केली. त्याने टाकलेले यॉर्कर विसरू शकत नाही. तुषार आणि शार्दुलनेही चांगली कामगिरी केली.”, असं ऋतुराज गायकवाड म्हणाला.
दुसरीकडे, हार्दिक पांड्याने पराभवाचं विश्लेषण आपल्या शैलीत केलं. “हे धावसंख्या गाठण्यासारखी होती. पण त्यांनी खरंच चांगली गोलंदाजी केली.पथिराना वेगळंच रसायन आहे. त्यांनी प्लाननुसार सर्व गोष्टी केल्या. यात स्टम्पच्या मागे असलेल्या माणसाचा मोठा हात आहे. या खेळपट्टीवर चेंडू थोडा थांबून येत होता. त्यामुळे फलंदाजी करणं थोडं कठीण गेलं. आता पुढचे चार सामने मुंबईबाहेर असणार आहोत. त्यात चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.”
विजयानंतर मुंबईकर शार्दुल ठाकुरने आनंद व्यक्त केला आहे. “वानखेडेवर मुंबई इंडियन्सला पराभूत करणं सोपं नाही. रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबेने चांगली फलंदाजी केली. ही वापरलेली खेळपट्टी होती. मला वाटतं जेव्हा जेव्हा ही खेळपट्टी वापरली जाते तेव्हा पहिल्या गेमपेक्षा हळू चालते.”, असं शार्दुल ठाकुर म्हणाला.