IPL 2026: मुंबई इंडियन्सचं स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात, सहाव्या पराभवानंतर हार्दिक पांड्या म्हणाला..
आयपीएल 2026 स्पर्धेत मुंबई इंडियन्सची हाराकिरी सुरूच आहे. एकापाठोपाठ एक पराभवाची मालिका सुरूच आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पुन्हा एकदा पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. या पराभवानंतर कर्णधार हार्दिक पांड्याने आपलं मत व्यक्त केलं.

मुंबई इंडियन्स संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा असताना पराभवाची मालिका पाहून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण ही वस्तुस्थिती आहे. कारण मुंबई इंडियन्सला आठ पैकी सहा सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे आता प्लेऑफच्या आशा धूसर होताना दिसत आहेत. तसं पाहिलं तर मुंबई इंडियन्सला प्लेऑफची संधी आहे. आता उर्वरित सहा पैकी सामना सहा सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. तसेच 20 षटकात 5 गडी गमवून 243 धावा केल्या. या धावा खरं तर खूप होत्या. मात्र सनरायझर्स हैदराबादने पावरप्लेमध्येच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा डाव खिळखिळा केला होता. पावरप्लेमध्ये सनरायझर्स हैदराबादने एकही विकेट न गमावता 92 धावा केल्या होत्या.
सनरायझर्स हैदराबादच्या तीन विकेट 133 धावा असताना पडल्या. त्यामुळे सामना मुंबई इंडियन्सच्या बाजूने झुकेल असं वाटलं होतं. पण तसं झालं नाही. हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने सामना मुंबईपासून दूर नेला. हेनरिक क्लासेनने 22 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. हा सामना सनरायझर्स हैदराबादने सहज जिंकला. या पराभवानंतर मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या संतापलेला दिसला. कारण या पराभवामुळे पुढची वाट बिकट झाली आहे.
हार्दिक पांड्या म्हणाला की, ‘मला नाही वाटत की दवबिंदूंनी फार काही भूमिका बजावली, फक्त एवढंच की त्यांनी काही चांगले फटके मारले, आम्ही खराब चेंडू टाकले. आज मैदानावर मला खूप मजा आली. 244 या धावा रोखण्यासाठी मी माझ्या गोलंदाजांना पाठिंबा देईन. पण आम्ही ते प्रत्यक्षात उतरवू शकलो नाही. शेवटचे तीन चेंडू वगळता गोलंदाजीचा आनंद घेतला, पण मी स्वतःही खूप आनंदात होतो. हा असाच हंगाम राहिला आहे. तुम्हाला संधी मिळते, तुम्ही ती साधली पाहिजे. जर तुम्ही तसे केले नाही, तर ते तुम्हाला त्रास देते. या हंगामात, आमच्याकडे फारसे पर्याय नाहीत. मी माझ्या गोलंदाजांना दोष देणार नाही. एक संघ म्हणून, एमआय ज्यासाठी ओळखला जातो ते आम्ही करू शकलो नाही. ‘
हार्दिक पांड्या पुढे म्हणाला की, ‘आमचे मालक आणि सपोर्ट स्टाफ उत्साही आहेत, आशा आहे की आम्ही काहीतरी मार्ग काढू. आम्ही आमच्या चाहत्यांना आम्हाला पाठिंबा देण्याची फारशी संधी दिली नाही. पण ते अप्रतिम आणि निष्ठावान राहिले आहेत. कधीकधी जेव्हा विरोधी संघ येतो आणि ते त्यांच्या नावाचा जयघोष करू लागतात तेव्हा वाईट वाटते. पण कदाचित आम्हाला त्यांनाअधिक संधी देण्याची गरज आहे.’