रोहित शर्मा, जयस्वाल असलेल्या मुंबई संघाचा जम्मू काश्मीरने उडवला धुव्वा, 5 विकेट राखून विजय

रणजी स्पर्धेत जम्मू काश्मीरने बलाढ्य मुंबई संघाचा 5 गडी राखून धुव्वा उडवला. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, शिवम दुबे, श्रेयस अय्यर या सारखे दिग्गज खेळाडू असूनही पराभवाची धूळ चाखावी लागली. जम्मू काश्मीरने 2014 नंतर मुंबईला पराभूत केलं.

रोहित शर्मा, जयस्वाल असलेल्या मुंबई संघाचा जम्मू काश्मीरने उडवला धुव्वा, 5 विकेट राखून विजय
Image Credit source: BCCI
| Updated on: Jan 25, 2025 | 3:17 PM

रणजी स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यात मुंबई आणि जम्मू काश्मीर हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल मुंबईच्या बाजूने लागला आणि कर्णधार अजिंक्य रहाणे याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण दिग्गज खेळाडू असलेला मुंबई संघ अवघ्या 120 धावांवरच गारद झाला. त्या बदल्यात जम्मू काश्मीर संघाने पहिल्या डावात 206 धावा करत 86 धावांची आघाडी घेतली. दुसऱ्या डावातही मुंबईची घसरगुंडी सुरु झाली. मुंबई संघात रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, अजिंक्य रहाणे आणि शार्दुल ठाकुर यासारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र शार्दुल ठाकुर वगळता एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकला नाही. शार्दुल ठाकुरच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबई 290 धावांपर्यंत मजल मारली. मुंबईने 204 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान जम्मू काश्मीर संघाने 5 गडी गमवून पूर्ण केलं.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या फॉर्म परत मिळवण्यासाठी रणजी स्पर्धेत उतरला होता. पण इथेही त्याच्या पदरी निराशा पडली. पहिल्या डावात रोहित शर्माने 3, तर दुसऱ्या डावात 28 धावा केल्या. यशस्वी जयस्वालची काहिशी अशीच स्थिती होती. पहिल्या डावात 4 आणि दुसऱ्या डावात 26 धावा केल्या. शिवम दुबेला तर दोन्ही डावात खातं खोलता आलं नाही. अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरही फेल गेले. तर दुसऱ्या डावात शार्दुल ठाकुरने लाज राखली. 135 चेंडूत 18 चौकाराच्या मदतीने 119 धावा केल्या. तर तनुष कोटियनने 136 चेंडूत 62 धावांची खेळी केली होती.

दोन्ही संघांची प्लेइंग 11

जम्मू आणि काश्मीर (प्लेइंग इलेव्हन): शुभम खजुरिया, विव्रत शर्मा, अब्दुल समद, पारस डोग्रा (कर्णधार), कन्हैया वाधवान (विकेटकीपर), औकिब नबी दार, यावर हसन, युधवीर सिंग चरक, आबिद मुश्ताक, उमर नजीर मीर, वंशज शर्मा.

मुंबई (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, हार्दिक तामोरे (विकेटकीपर), शिवम दुबे, शार्दुल ठाकूर, शम्स मुलानी, तनुष कोटियन, मोहित अवस्थी, कर्श कोठारी.