तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया ‘युजलेस’; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार

| Updated on: Aug 28, 2021 | 11:40 PM

इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभूत झाल्यामुळे टीम इंडियाचे टीकाकार पुन्हा एकदा जागे झाले आहेत. त्यांनी भारतीय संघावर, सामन्यात चांगली कामगिरी करु न शकलेल्या खेळाडूंवर तोंडसुख घेणं सुरु केलं आहे.

तिसऱ्या कसोटीत पराभूत होणारी टीम इंडिया युजलेस; मायकल वॉनचा विराटसेनेवर वार
मायकल वॉन
Follow us on

हेडिंग्ले : तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. (Michael Vaughan attacks on team India, said they are useless after defeat in the third test match against England)

दरम्यान, या सामन्यात पराभूत झाल्यामुळे टीम इंडियाचे टीकाकार पुन्हा एकदा जागे झाले आहेत. त्यांनी भारतीय संघावर, सामन्यात चांगली कामगिरी करु न शकलेल्या खेळाडूंवर तोंडसुख घेणं सुरु केलं आहे. टीम इंडियाचा नेहमीचा टीकाकार मायकल वॉनदेखील आता बाहेर आला आहे. त्यानेदेखील टीम इंडियावर तोंडसुख घेतलं आहे. त्याने नेहमीप्रमाणे ट्विटरवरुन भारतीय संघावर हल्ला केला आहे. वॉनने दोन ट्विट्स केले आहेत. त्यापैकी पहिल्या ट्विटमध्ये त्याने म्हटलं आहे की, “गुड जॉब, या टेस्टमध्ये चॅम्पियनशीप क्रिकेटचे दर्शन घडले. ज्यामुळे इंग्लंडचा संघ अधिक चमकदार कामगिरी करु शकला.”

दुसऱ्या एका ट्विटमध्ये वॉनने म्हटले आहे की, “इंग्लंडकडून चमकदार आणि क्रूर कामगिरी, मिळेल तितकं कमीच. लॉर्ड्सनंतर असे प्रदर्शन करणे संघाचे कॅरेक्टर दर्शवते, जे त्यांच्या कर्णधाराकडून येतं… मागील काही दिवस भारताने विसरण्यासारखे आहेत. ते (टीम इंडिया) खरोखर युजलेस दिसत होते. ”

भारताचा डावाने पराभव

भारताने तिसऱ्या दिवसअखेर 80 षटकात 2 गड्यांच्या बदल्यात 215 धावांपर्यंत मजल मारली होती. चेतेश्वर पुजारा 91 तर कर्णधार विराट कोहली 45 धावांवर नाबाद खेळत होते. त्यामुळे भारत सुस्थितीत होता. मात्र आजचा दिवस इंग्लंडच्या गोलंदाजांचा होता. इगंल्ंडच्या गोलंदाजांनी अवघ्या एका सत्रात टीम इंडियाचे 8 फलंदाज बाद केले. आजच्या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच पुजारा 91 धावांवर बाद झाला. त्यापाठोपाठ विराट कोहली अर्धशतक करुन बाद. झाला. त्यानंतर विकेट्सची रांग लागली. अखेरच्या षटकात रवींद्र जाडेजाने थोडी फटकेबाजी करुन मनोरंजन केलं, मात्र तो भारताचा डावाने होणारा पराभव रोखू शकला नाही. दुसऱ्या डावात रोहित शर्मा, पुजारा आणि कोहली या तिघांनी अर्धशतकं झळकावली. मात्र त्यांना मोठी धावसंख्या उभारता आली नाही. या तिघांव्यतिरिक्त कोणत्याही भारतीय फलंदाजाला फार वेळ मैदानात टिकता आलं नाही. अखेर भारताचा डाव 278 धावांमध्ये संपुष्टात आला. टीम इंडियाला पहिल्या डावात 78 तर दुसऱ्या डावात 278 धावा करता आल्या. त्यामुळे या सामन्यात भारताला एक डाव आणि 76 धावांनी पराभूत व्हावं लागलं आहे.

रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा पंच’नामा

भारताच्या दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 78 धावांमध्ये आटोपला. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला केवळ 278 धावा करता आल्या. भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून जेम्म अँडरसनने 3, क्रेग ओव्हरटनने 3, मोईन अलीने 2 आणि ऑली रॉबिन्ससने 2 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात रॉबिन्ससने टीम इंडियाचा ‘पंच’नामा केला. त्याने या डावात 5 बळी घेतले. तर क्रेग ओव्हरटनने या डावातसुद्धा 3 विकेट घेतल्या. मोईन अली आणि जेम्म अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली. रॉबिन्सनला या सामन्यानंतर सामनावीराचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

भारताचा पहिला डाव

नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.

इंग्लंडची जबरदस्त फलंदाजी

इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंग उभा केला होता. इंग्लंडकडून या डावात एक शतक तर तीन फलंदाजांनी अर्धशतकं फटकावली. सलामीवीर रॉरी बर्न्सने 61 धावांची खेळी केली तर हासीब हमीदने 68 धावांची खेळी केली. या दोघांनी 135 धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेल्या डेव्हिड मलाने 70 धावांची खेळी केली. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या जो रुटने या मालिकेतलं सलद तिसरं शतक ठोकलं. त्याने 14 चौकारांच्या मदतीने 121 धावांची खेळी केली. त्यानंतर पुढच्या कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. तीन अर्धशतकं आणि एका शतकाच्या जोरावर इंग्लंडने 432 धावा जमवल्या.

इतर बातम्या

IND vs ENG : फॉर्मात परतलेल्या पुजाराच्या शॉटने अंपायरचं डोकं फुटलं असतं, पाहा थरारक Video

Eng vs Ind : आधी रुटचं शतक, मग रॉबिन्सनकडून टीम इंडियाचा ‘पंच’नामा, भारताचा डावाने पराभव

संघात स्थान न मिळाल्याने आश्विन फलंदाजीच्या सरावात व्यस्त, PHOTO केला शेअर, फोटो पाहून फॅन्सना पडला मोठा प्रश्न

(Michael Vaughan attacks on team India, said they are useless after defeat in the third test match against England)