IND vs ENG 3rd Test Day 4 Live : तिसऱ्या कसोटीमध्ये पहिल्या डावात भारताला 78 धावांमध्ये ऑल आऊट केल्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 432 धावांचा डोंगर उभा केला. त्यानंतर दुसऱ्या डावातील फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या भारतीय फलंदाजांनी सुरुवातीला चांगली फलंदाजी करत तिसरा दिवस आपल्या नावे केला. मात्र चौथ्या दिवशी टीम इंडियाची पुन्हा एकदा घसरगुंडी पाहायला मिळाली. कालच्या 2 बाद 215 वरुन पुढे खेळणाऱ्या टीम इंडियाने आज एका सत्रात उर्वरित 8 विकेट्स गमावल्या. अखेर भारताचा डाव 278 धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यात भारतावर एक डाव आणि 76 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह इंग्लंडने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.
भारताच्या दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी जबरदस्त गोलंदाजी केली. पहिल्या डावात इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारताचा डाव 78 धावांमध्ये आटोपला. तर दुसऱ्या डावात टीम इंडियाला केवळ 278 धावा करता आल्या. भारताच्या पहिल्या डावात इंग्लंडकडून जेम्म अँडरसनने 3, क्रेग ओव्हरटनने 3, मोईन अलीने 2 आणि ऑली रॉबिन्ससने 2 विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात रॉबिन्ससने टीम इंडियाचा ‘पंच’नामा केला. त्याने या डावात 5 बळी घेतले. तर क्रेग ओव्हरटनने या डावातसुद्धा 3 विकेट घेतल्या. मोईन अली आणि जेम्म अँडरसनने प्रत्येकी एक विकेट घेतली.
नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी घेतलेल्या भारतीय संघासाठी तिसऱ्या कसोटीचा पहिला दिवस अतिशय खराब ठरला होता. भारतीय संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण कर्णधार विराट कोहली याचा हाच निर्णय चुकीचा ठरताना दिसला. कारण प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय फलंदाजांची सुरुवातच खराब झाली. इंग्लंडच्या गोलंदाजांच्या माऱ्यापुढे भारतीय फलंदाज फार काळ तग धरु शकले नाहीत. टीम इंडियाचे सर्व फलंदाज अवघ्या 78 धावांवर तंबूत परतले. भारतीय संघाकडून रोहित शर्मा याने सर्वाधिक 19 धावा केल्या. इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि क्रेग आव्हर्टन यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर ऑली रॉबिन्सन आणि सॅम करन यांनी प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
भारताने 10 वी विकेट गमावली आहे. क्रेग ओव्हरटनने मोहम्मद सिराजला जॉनी बेअरस्टोकरवी झेलबाद करत भारताचा डाव संपुष्टात आणला आहे. भारताने या डावात 278 धावा केल्या.
भारताने 9 वी विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने रवींद्र जाडेजाला 30 धावांवर असताना विकेटकीपर जॉस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 278/9)
भारताचा 8 वा गडी माघारी परतला आहे. ऑली रॉबिन्सनने इशांतला 2 धावांवर असताना विकेटकीपर जॉस बटलरकरवी झेलबाद केलं. (भारत 257/8)
भारताने सातवी विकेट गमावली आहे. मोईन अलीने मोहम्मद शमीला 6 धावांवर असताना त्रिफळाचित केलं. (भारत 254/7)
भारताने अजिंक्य रहाणेपाठोपाठ अजून एक विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने रिषभ पंतला क्रेग ओव्हरटनकरवी झेलबाद केलं. (भारत 239/6)
विराट कोहलीपाठोपाठ भारताने पाचवी विकेट गमावली आहे. अजिंक्य रहाणे 10 धावांवर असताना जेम्स अँडरसनने त्याला यष्टीरक्षक जॉस बटलरकरवी झेलबाद केलं.
भारताने चौथी विकेट गमावली आहे. 90 व्या षटकात ऑली रॉबिन्सनने विराट कोहलीला जो रुटकरवी झेलबाद केलं. (भारत 237/4)
90 व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर ऑली रॉबिन्सनच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने शानदार चौकार लगावत अर्धशतक पूर्ण केलं आहे. विराटने 120 चेंडूत 7 चौकारांच्या मदतीने 51 धावांची खेळी केली आहे. याच षटकातील 5 व्या चेंडूवर विराटने आणखी एक चौकार लगावला (भारत 237/3)
भारताने आजच्या दिवसातीत चौथ्याच षटकात महत्त्वाची विकेट गमावली आहे. ऑली रॉबिन्सनने चेतेश्वर पुजाराला पायचित केलं. (भारत 215/2)
चौथ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली असून चेतेश्वर पुजारा (91) आणि विराट जोडी (45) मैदानात दाखल झाली आहे.
Published On - Aug 28,2021 3:22 PM