Team India : टीम इंडियाला मायदेशात कसोटी मालिकेत लोळवणारे 6 संघ, पाकिस्तान कितव्या स्थानी?

Test Cricket : न्यूझीलंडने टीम इंडियाला पुण्यात दुसर्‍या सामन्यात पराभूत करत पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. टीम इंडियाला आतापर्यंत किती संघांनी मायदेशात कसोटी मालिकेत पराभूत केलंय? जाणून घ्या.

Team India : टीम इंडियाला मायदेशात कसोटी मालिकेत लोळवणारे 6 संघ, पाकिस्तान कितव्या स्थानी?
virat rohit team india test
| Updated on: Oct 28, 2024 | 7:50 PM

भारत दौऱ्यावर असलेल्या न्यूझीलंड क्रिकेट टीमने कसोटी मालिका जिंकत इतिहास रचला आहे. न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने आधी बंगळुरुत विजयी सलामी दिली. न्यूझीलंडने यासह अनेक दशकानंतर भारतात कसोटी सामना जिंकला. त्यानंतर पुण्यात झालेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा धुव्वा उडवत पहिल्यांदा मालिका जिंकली. टीम इंडियाची मायदेशात 2012 नंतर कसोटी मालिका गमावण्याची ही पहिलीच वेळ ठरली. या निमित्ताने टीम इंडियाला भारतात कसोटी मालिकेत सर्वाधिक वेळा पराभूत करणाऱ्या काही संघांबाबत आपण जाणून घेऊयात.

इंग्लंड नंबर 1

इंग्लंडने टीम इंडियाला मायदेशात सर्वाधिक कसोटी मालिकेत पराभूत करण्याची कामगिरी केली आहे. इंग्लंडने अखेरीस 2012-2013 दौऱ्यात टीम इंडियाला मायदेशातील कसोटी मालिकेत लोळवलं होतं. इंग्लंडने भारतात सर्वातआधी 1933-1934 साली कसोटी मालिका जिंकली होती. त्यानंतर इंग्लंडने भारताला 1976-77, 1979-80 आणि 1984-1985 साली मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं.

वेस्ट इंडिजने भारतात 5 वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. विंडिजने टीम इंडियाला मायदेशात1948- 1949 साली पहिल्यांदा कसोटी मालिकेत पराभूत केलं होतं. त्यानंतर 1958-1959, 1966-1967, 1974-1975 आणि 1983-1984 साली कसोटी मालिकेत लोळवलं होतं.मात्र त्यानंतर विंडिजला भारतात कसोटी मालिका जिंकता आलेली नाही

ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानी

ऑस्ट्रेलियाने टीम इंडिया विरुद्ध 4 वेळा कसोटी मालिका जिंकली आहे. कांगारुंनी 1956-1957 साली पहिल्यांदा ही कामगिरी केली. त्यानंतर 1959-1960, 1969-1970 आणि 2004-2005 मध्ये ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका जिंकली.

तर पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका आणि आता न्यूझीलंड या तिन्ही संघांनी भारताला मायदेशात एका कसोटी मालिकेत पराभूत केलं आहे. पाकिस्तानने 1986-87 तर दक्षिण आफ्रिकेने 1999-2000 च्या भारत दौऱ्यात पराभूत केलं होतं.

व्हाईटवॉशची टांगती तलवार

दरम्यान टीम इंडियावर मायदेशात व्हाईटवॉशची टांगती तलवार आहे. टीम इंडिया न्यूझीलंड विरूद्धच्या मायदेशातील मालिकेत 0-2 ने पिछाडीवर आहे. अशात तिसरा आणि अंतिम सामना हा 1 ते 5 नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. हा सामना कर्णधार रोहित शर्मा याच्या होम ग्राउंड अर्थात मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे टीम इंडिया शेवटचा सामना जिंकून व्हाईटवॉश टाळणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे. आता या प्रयत्नात कोण यशस्वी ठरतं? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us