मुंबई: यंदाच्या रणजी सीजनमध्ये (Ranji Trophy) मुंबई आणि मध्य प्रदेश (Mumbai vs Madhya pradesh) हे दोन संघ फायलनमध्ये पोहोचले आहेत. बंगळुरुमध्ये दोन्ही टीम्स मध्ये अंतिम सामना सुरु आहे. आज सामन्याचा दुसरा दिवस आहे. काल मुंबईचा कॅप्टन पृथ्वी शॉ ने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्यादिवस अखेर मुंबईच्या पाच बाद 248 धावा झाल्या होत्या. आज दुसऱ्यादिवशी मुंबईला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. शम्स मुलानीच्या रुपाने मुंबईला आज पहिला धक्का बसला. मुलानी कालच्या धावसंख्येवर 12 धावांवर बाद झाला. त्याला गौरव यादवने पायचीत पकडलं. त्यानंतर काल 40 धावांवर नाबाद असलेल्या सर्फराज खान (Sarfaraz Khan) आणि तनुष कोटियनने डाव पुढे नेला. त्यांनी आणखी 40 धावांची भर घातल्यानंतर कोटियनच्या रुपाने मुंबईचा सातवा गडी बाद झाला. त्याला सुद्धा गौरव यादवने 15 धावांवर क्लीन बोल्ड केलं.
सर्फराज खानने त्या प्रतिकुल परिस्थितीतही मुंबईचा किल्ला लढवत ठेवला व शानदार शतक झळकावलं. तो 119 धावांवर नाबाद आहे. धवल कुलकर्णीला अवघ्या एक रन्सवर अग्रवालने मंत्रीकरवी झेलबाद केलं. आता तृषार देशपांडे आणि सर्फराज खानची जोडी मैदानात आहे. मुंबईच्या आठ बाद 351 धावा झाल्या आहेत.
मुंबईकडून काल यशस्वी जैस्वालने सर्वाधिक 78 धावा केल्या. तो 163 चेंडूत 78 धावांची खेळी करुन आऊट झाला. यशस्वी जैस्वालने 7 चौकार आणि 1 षटकार ठोकला. चौथ शतक झळकवण्याची त्याची संधी हुकली. याआधी क्वार्टर फायनलमध्ये उत्तराखंड विरुद्ध त्यानंतर सेमीफायनल मॅचमध्ये उत्तर प्रदेश विरुद्ध दोन्ही डावात दोन शतकं झळकावली होती. काल यशस्वी खेळपट्टीवर टिकून राहिला पण त्याला शतकी खेळी करता आली नाही.
मुंबईने काल चांगली सुरुवात केली होती. सुरुवातीच्या षटकांमध्ये मध्य प्रदेशच्या गोलंदाजांना यश मिळणार नाही, याची मुंबईच्या सलामीवीरांनी काळजी घेतली. पृथ्वी आणि डावखुऱ्या यशस्वी जैस्वालने पहिल्या विकेटसाठी 87 धावांची सलामी दिली. पृथ्वीच्या रुपाने मुंबईचा पहिला विकेट गेला. अग्रवालने त्याला क्लीन बोल्ड केलं. पृथ्वीने 79 चेंडूत 47 धावा केल्या. यात 5 चौकार आणि 1 षटकार होता. अरमान जाफर आणि सुवेद पारकर आज मोठी खेळी करु शकले नाहीत. अरमान जाफर डावखुरा फिरकी गोलंदाज कार्तिकेयच्या गोलंदाजीवर (26) धावांवर दुबेकरवी झेलबाद झाला. त्यानंतर सुवेद पारकरही विशेष चमक दाखवू शकला नाही.