Ranji Trophy: शानदार शतकाने नव्या वर्षाची सुरुवात, भारतीय ओपनरला टीम इंडियाच तिकिट मिळणार?

Ranji Trophy: वर्षभरापूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळला, तेव्हापासून हा ओपनर टीम इंडियाच्या बाहेर आहे.

Ranji Trophy: शानदार शतकाने नव्या वर्षाची सुरुवात, भारतीय ओपनरला टीम इंडियाच तिकिट मिळणार?
Ranji Trophy
Image Credit source: AFP
| Updated on: Jan 05, 2023 | 9:36 AM

बंगळुर: टीम इंडिया नव्या वर्षात पहिली टेस्ट सीरीज ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळणार आहे. पुढच्या महिन्यापासून ही टेस्ट सीरीज सुरु होईल. या टेस्ट सीरीजमध्ये ओपनिंगच्या जागेसाठी अजूनही संधी आहे. कारण केएल राहुल आणि शुभमन गिलच्या प्रदर्शनात सातत्य नाहीय. ओपनिंगच्या जागेसाठी अन्य दावेदारही आहेत. एका खेळाडूने नव्या वर्षाची सुरुवात शतकाने केलीय. टीम इंडियाकडून खेळण्याची संधी मिळावी, अशी त्याला अपेक्षा असेल. हा फलंदाज आहे मयंक अग्रवाल.

कमतरता भरुन काढली

मयंक अग्रवाल टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा ओपनर होता. हळू हळू तो स्क्वॉडच्या बाहेर गेला. टीममध्ये पुनरागमनासाठी त्याला जबरदस्त प्रदर्शन करावं लागेल. रणजी ट्रॉफीच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये तो मोठी इनिंग खेळू शकला नाही. कर्नाटकच्या या दिग्गज फलंदाजाने अखेर 2023 च्या पहिल्या डावात ही कमतरता भरून काढली.

नाबाद शतकाने सुरुवात

बंगळुरु येथे एलीट ग्रुप सी चा सामना सुरु आहे. कर्नाटकचा कॅप्टन मयंक अग्रवालने छत्तीसगड विरुद्ध शानदार शतक झळकावलं. दुसऱ्यादिवशी मयंकने 191 चेंडूत नऊ चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने नाबाद 102 धावा केल्या. त्याच्या शतकाच्या बळावर कर्नाटकने दुसऱ्यादिवसाचा खेळ संपताना पहिल्या डावात एक विकेट गमावून 202 धावा केल्या आहेत. अग्रवालने ओपनर रविकुमार समर्थसोबत पहिल्या विकेटसाठी 163 धावांची भागीदारी केली.

शेवटचा सामना कधी खेळला?

मागच्यावर्षी श्रीलंकेविरुद्ध टेस्ट सीरीजपर्यंत मयंक अग्रवाल टीम इंडियाचा ओपनर होता. बांग्लादेश विरुद्ध कसोटी मालिकेत तो टीमचा भाग नव्हता. त्याच्याजागी टीम इंडिया बंगालचा युवा फलंदाज अभिमन्यु ईश्वरनला बॅकअप ओपनर म्हणून पाहतेय. कॅप्टन रोहित शर्मा बरोबर केएल राहुल आणि शुभमन गिल ओपनरची जबाबदारी संभाळतात. बरोबर वर्षभरापूर्वी शेवटचा कसोटी सामना खेळणाऱ्या मयंक अग्रवालसाठी टीम इंडियात पुनरागमन सोपं नसेल.