विद्यार्थी आंदोलनावर सचिन तेंडुलकर यांचं ट्वीट, त्यांची निराशा स्वाभाविक आहे…
नीट परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानंतर संपूर्ण देशाचं राजकारण ढवळून निघालं आहे. दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू असून शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहेत. दुसरीकडे, विद्यार्थी आंदोलनाला देशभरातून प्रतिसाद मिळत आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यानेही ट्वीट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

देशभरात नीट परीक्षेत झालेल्या प्रकरानंतर संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात काही विद्यार्थ्यांनी आपली जीवनयात्राही संपवली. सदर प्रकरणानंतर विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. कॉकरोज जनता पार्टीने हाच मुद्दा हाताशी घेऊन दिल्लीच्या जंतर मंतर मैदानात आंदोलन सुरू केलं आहे. त्यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोरकसपणे धरली आहे. त्यांच्या समर्थनार्थ सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक हे देखील मैदानात उतरले असून त्याचं आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणादरम्यात त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात भरती केलं होतं. त्यानंतर आता गुरूग्रामच्या मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यानंतर 20 जुलैला हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत संसदेवर मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला. त्यामुळे संपूर्ण देशात संताप व्यक्त होत आहे. असं असताना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थी आंदोलनावर प्रतिक्रिया दिली आहे.
वडिलांनी दिलेल्या शिकवणीचा दिला दाखला
सचिन तेंडुलकरने आपल्या वडिलांचा उल्लेख करत लिहिलं की, ‘माझे वडील प्राध्यापक होते. ते अनेक तरुण विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक आणि गुरू होते. त्यांनी मला सुरुवातीपासून एक गोष्ट शिकवली, ‘अपयश ठीक आहे, पण फसवणूक नाही. कधीही शॉर्टकट घेऊ नका.’ समाजातील प्रौढ व्यक्ती म्हणून संस्कृतीला योग्य दिशेने मार्गदर्शन करणे ही आपली जबाबदारी आहे. जो समाज कठोर परिश्रमापेक्षा निकालाला महत्त्व देतो, तो कार्यक्षमतेऐवजी शॉर्टकट निवडतो.’
— Sachin Tendulkar (@sachin_rt) July 23, 2026
विद्यार्थ्यांची निराशा स्वाभाविक आहे
सचिन तेंडुलकरने पुढे लिहिलं की, ‘आज जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले नाही म्हणून निराशा वाटते, तेव्हा त्यांची निराशा स्वाभाविक आहे. त्यांना पुन्हा कधीही असे वाटू नये, यासाठी आपण सर्वांनी मिळून काम केले पाहिजे. तरुण भारत स्वप्ने आणि ऊर्जेने परिपूर्ण आहे. तेच आपल्या यशाचा पाया आहेत. एक समाज म्हणून, पालक, शिक्षक, मित्र, नातेवाईक, शाळा आणि प्रशासक.. आपली तरुण पिढी नेहमी उत्साही आणि ऊर्जावान राहील, हे सुनिश्चित करण्यासाठी आपल्या सर्वांवर मोठी जबाबदारी आहे आणि वेगवेगळ्या भूमिका बजावायच्या आहेत.’