Virat Kohli Resign: संजय मांजरेकरांनी सांगितलं, विराटच कॅप्टनशिप सोडण्यामागचं नेमकं कारण…

| Updated on: Jan 16, 2022 | 2:04 PM

विराटने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराटने टि्वटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली. त्याने स्टेटमेंट पोस्ट करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

Virat Kohli Resign: संजय मांजरेकरांनी सांगितलं, विराटच कॅप्टनशिप सोडण्यामागचं नेमकं कारण...
Follow us on

मुंबई: टी-20 पाठोपाठ विराट कोहलीने (Virat Kohli) शनिवारी कसोटी संघाचं कर्णधारपद सोडलं. वनडेच्या कॅप्टनशिपवरुन त्याला आधीच हटवण्यात आलं आहे. विराटचा कसोटी संघाचे नेतृत्व सोडण्याचा निर्णय अनेकांसाठी धक्कादायक आहे. त्यावर विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका (South Africa test series) 2-1 अशी गमावल्यानंतर विराटने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला. विराटने टि्वटरवरुन राजीनाम्याची घोषणा केली. त्याने स्टेटमेंट पोस्ट करताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

विराटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्यानंतर विविध आजी-माजी क्रिकेटपटू त्याच्या या निर्णयावर वेगवेगळे तर्क-वितर्क व्यक्त करत आहेत. माजी क्रिकेटपटू आणि प्रसिद्ध समालोचक संजय मांजरेकर यांनी सुद्धा आपला तर्क मांडला आहे.

काय म्हणाले संजय मांजरेकर?
“विराट कोहलीला जेव्हा कधी आपल्या कॅप्टनशिपला धोका निर्माण होईल, असं वाटतं, तेव्हा तो कॅप्टनशिप सोडून देतो. त्याने फार कमी कालावधीत आयपीएल आणि त्यानंतर टी-20 ची कॅप्टनशिप सोडली. कसोटीचे कर्णधारपद सोडण्याचा त्याचा निर्णय बुचकळ्यात टाकणारा आहे. तिन्ही फॉर्मेटचे कर्णधारपद त्याने खूप लवकर सोडले. माझ्या मते कर्णधारपद कायम स्वत:कडे टिकवण्याचा कोहलीचा प्रयत्न असतो. जेणेकरुन कोणी त्याला हटवणार नाही. पण जेव्हा कधी त्याला असं वाटतं, की आपलं कर्णधारपद धोक्यात आहे, तेव्हा कोहली कॅप्टनशिप सोडतो” असे संजय मांजरेकर म्हणाले.

रवी शास्त्री नसल्यामुळे कोहलीची अडचण वाढली
“रवी शास्त्री हेड कोच पदावरुन गेल्यामुळे विराट कोहलीसाठी खूप गोष्टी बदलत चालल्या होत्या. त्यामुळे तो अस्वस्थ होता. अनिल कुंबळे कोच असतानाही, कोहली अस्वस्थ होता. पण शास्त्री आल्यानंतर त्याला हायस वाटलं. नवीन कोच राहुल द्रविड रवी शास्त्री सारखे नाहीयत. काही गोष्टींची विराटला कल्पना आली असेल. व्यक्तीगत पातळीवर विराटचा फॉर्मही फार चांगला नाहीय. त्यावरही सगळ्यांच लक्ष आहे. विराट मजबूत स्थितीमध्ये नाहीय. या गोष्टी क्रिकेटच्या जाणकारांच्या सहज लक्षात येणाऱ्या आहेत” असे संजय मांजेरकर म्हणाले.

(sanjay manjrekar explains reasons behind virat kohlis test captaincy resignation)