दिनेश कार्तिकला टी20 वर्ल्डकप संघात घ्यायचं की नाही? युवराज सिंग म्हणाला…

| Updated on: Apr 26, 2024 | 8:33 PM

आयपीएल 2024 स्पर्धा सुरु असताना टी20 वर्ल्डकप स्पर्धेबाबत खलबतं सुरु आहेत. संघात कोण असायला हवं आणि कोण नाही याची चर्चा सुरु झाली आहे. आयपीएलमधील कामगिरी पाहून काही खेळाडूंची नावं चर्चेत आहेत. यात आरसीबीकडून खेळणारा विकेटकीपर बॅट्समन दिनेश कार्तिक याचंही नाव आहे. याबाबत माजी क्रिकेटपटून युवराज सिंगने आपलं मत व्यक्त केलं आहे.

दिनेश कार्तिकला टी20 वर्ल्डकप संघात घ्यायचं की नाही? युवराज सिंग म्हणाला...
Follow us on

आयपीएल 2024 स्पर्धा आता हळूहळू शेवटच्या टप्प्यात येत आहे. संघांमध्ये प्लेऑफसाठीची चुरस वाढली आहे. असं असताना टी20 वर्ल्डकप संघाच्या निवडीसाठी जोरदार रस्सीखेच होताना दिसत आहे. त्यामुळे संघात कोणाला घ्यायचं नाही कोणाला नाही याबाबत माजी क्रिकेटपटू आपली मतं मांडत आहेत. काही जणांनी टी20 वर्ल्डकपसाठी आपला संघही जाहीर केला आहे. या वर्ल्डकप संघासाठी दिनेश कार्तिक याच्या नावाची चर्चा रंगली आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याने वानखेडेवर रंगलेल्या सामन्यात मजेशीरपणे डोक्यात वर्ल्डकप सुरु असल्याचं सांगितलं होतं. तसेच दिनेश कार्तिकचा फॉर्म पाहता चर्चा रंगणंही साहाजिकच आहे. आता या चर्चांवर माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याने रोखठोक मत मांडलं आहे. दिनेश कार्तिकला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार असेल तर निवड करा, असं युवराजने रोखठोकपणे सांगितलं आहे.

“दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करत आहे. असंच काहीस टी20 वर्ल्डकप 2022 मध्येही झालं होतं. पण तेव्हा काही चांगली कामगिरी करू शकला नाही. जर कार्तिक प्लेइंग इलेव्हनचा भाग नसेल तर त्याची निवड करण्यात काही उपयोग नाही. संघात ऋषभ पंत, संजू सॅमसन सारखे खेळाडू आहेत आणि ते खरंच चांगलं करत आहेत. त्यांचा फॉर्मही आहे. ते तरुण आहेत हे विशेष. जर दिनेश कार्तिकला संघात स्थानच मिळणार नसेल तर त्याच्याऐवजी तरुण खेळाडूची निवड करणं योग्य ठरेल.”, असं युवराज सिंग याने सांगितलं.

आयपीएल 2024 स्पर्धेत दिनेश कार्तिक जबरदस्त फॉर्मात आहे. लोअर ऑर्डरमध्ये फलंदाजीला येत त्याने आपली छाप सोडली आहे. आरसीबीसाठी आतापर्यंत खेळलेल्या 9 सामन्यात त्याने 262 धावा केल्या आहेत. त्यामुळे त्याच्या नावाची जोरदार चर्चा रंगली आहे. टी20 वर्ल्डकप संघाची निवड 30 एप्रिल किंवा 1 मे रोजी होणार आहे. त्यामुळे या संघात कोणत्या खेळाडूंना स्थान मिळतं आणि कोणाचा पत्ता कापला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. टीम इंडियाचा पहिला सामना 5 जून रोजी आयर्लंडसोबत आहे. तर 9 जून रोजी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानशी लढत होणार आहे.