T-20, Master Plan : विमानात रचला टी-20चा मास्टर प्लॅन, भारताच्या यशामागचं रहस्य हार्दिक पांड्या-दिनेश कार्तिककडे, जाणून घ्या…

भारताच्या या याशामागचं कारण काय आहे, याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

T-20, Master Plan : विमानात रचला टी-20चा मास्टर प्लॅन, भारताच्या यशामागचं रहस्य हार्दिक पांड्या-दिनेश कार्तिककडे, जाणून घ्या...
हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिकने ठरवला मास्टर प्लॅन
Image Credit source: social
Shubham Kulkarni | Updated on: Jun 18, 2022 | 1:39 PM

नवी दिल्ली : चौथ्या टी-20 (T-20) सामन्यात भारतानं दक्षिण आफ्रिकेचा (SA) 82 धावांनी मोठ्या फरकानं पराभव केला. या विजयासह टीम इंडियानं पाच सामन्यांच्या T-20 मालिकेत 2-2नं बरोबरी साधलीय. 37 वर्षीय दिनेश कार्तिकनं (Dinesh Karthik) चौथ्या सामन्यात भारतासाठी महत्त्वपूर्ण खेळी केली. त्याच्या खेळीमुळे भारतानं धावसंख्या उभारली. कार्तिकला त्याच्या खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कारही मिळाला. वास्तविक नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतानं एकावेळी 13 षटकांत केवळ 81 धावा केल्या होत्या आणि चार विकेट गमावल्या होत्या. ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर आणि कर्णधार ऋषभ पंत पॅव्हेलियनमध्ये परतले होते. यानंतर कार्तिकने हार्दिक पांड्यासोबत टीम इंडियाचा डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. दरम्यान, भारताच्या या याशामागचं कारण काय आहे, या मास्टर प्लॅन मागचा खरा मास्टर कोण आहे. याविषयी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर

राजकोट येथील सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला गेला. या सामन्यात भारतानं एकवेळ 81 धावांवर चार विकेट गमावल्या होत्या. 13 षटकांपर्यंत भारताची धावसंख्या अशीच फारशी चांगली नव्हती. पण त्यानंतर हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनी मिळून असा कहर केला की दक्षिण आफ्रिकेचे गोलंदाजही घाबरले. दिनेश कार्तिकनं 27 चेंडूत 55 आणि हार्दिकने 31 चेंडूत 46 धावांचे योगदान दिलं. सामन्यानंतर बीसीसीआयनं त्यांच्या संभाषणाचा व्हिडीओ शेअर केलाय. यामध्य दिनेश कार्तिकनं सांगितलं की, त्यानं आणि हार्दिकने विझाग ते राजकोटच्या फ्लाइटमध्ये राजकोट T20 मास्टर प्लॅन कसा बनवला होता.

कसा बनला मास्टर प्लॅन?

हार्दिकनं दिनेश कार्तिकला विचारलं की या खेळीबाबत तू काय सांगशिल त्यावर त्यानं उत्तर दिलं की, ‘आम्ही विझागहून राजकोटच्या फ्लाइटला येत असताना आम्ही याबद्दल बोललो होतो. अशा परिस्थितीत धावा कशा करायच्या. मधल्या फळीतील फलंदाजासाठी कोणत्या गोलंदाजाला लक्ष्य करायचं, कुठे धावा काढायच्या हे माहित असणं खूप महत्वाचं आहे, याविषयी आमचं बोलणं झालं होतं.’ यानंतर दिनेश कार्तिक म्हणाला की, ‘मला सुरुवातीला त्याच्याकडून खूप मदत मिळाली आणि मला तुझ्यासोबत फलंदाजी करायला आवडते. आम्ही खूप मजा करतो, सुरुवातीला जास्त बोलू नका, पण नंतर विकेट्सच्या दरम्यान मजा करत राहा. पहिले दोन सामने गमावल्यानंतर या सामन्याच्या पहिल्या 10 षटकांमध्ये फारशा धावा झाल्या नाहीत, त्यामुळे आमच्यावर दबाव होता.’ दरम्यान, विमानात ठरलेला हा मास्टर प्लॅन दोन्ही खेळाडूंनी उघड केल्यानं क्रिकेटप्रेमींना देखील याचं चागलंच कुतूहल आहे.

Follow Us