11 कोटी रुपयांच्या खेळाडूने आयपीएल 2025 मध्ये फक्त 2 सामने का खेळले? मुख्य प्रशिक्षकाने सांगितलं कारण..

आयपीएल 2025 स्पर्धा संपली असून आता फ्रेंचायझी संघाच्या जमेच्या बाजू आणि उणीवा शोधण्यात गुंतल्या आहेत. असं असताना दिल्ली कॅपिटल्सने 11 कोटी खर्च करून एका खेळाडूला संघात घेतलं पण फक्त दोनच सामने खेळला. यावरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात होते. या प्रकरणी आता मुख्य प्रशिक्षकांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

11 कोटी रुपयांच्या खेळाडूने आयपीएल 2025 मध्ये फक्त 2 सामने का खेळले? मुख्य प्रशिक्षकाने सांगितलं कारण..
टी नटराजन
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 07, 2025 | 8:12 PM

आयपीएल 2025 स्पर्धेच्या सुरुवातीला दिल्ली कॅपिटल्सने चांगली कामगिरी केली. मात्र चढता आलेख अचानक घसरला आणि प्लेऑफमध्येही जागा मिळवता आली नाही. दुसऱ्या टप्प्यात एक पाठोपाठ एक पराभवाचे धक्के बसले. त्यात स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क मायदेशी परतला तो आलाच नाही. असं असताना दिल्ली कॅपिटल्सकडून काही खेळाडूंनी आपली छाप टाकली. तर काही खेळाडूंची कामगिरी सुमार राहिली. अशी सर्व कारणमीमांसा करत असताना एक खेळाडू असा होता की त्याची चर्चा रंगली आहे. कारण त्याला थोडी थोडकी नाही तर 11 कोटी रुपये खर्च करून संघात घेतलं होतं. पण फक्त दोन सामने खेळवण्यात आले. त्यामुळे संघ व्यवस्थापनावर दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांनी टीकेची झोड उठवली आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्सचे मुख्य प्रशिक्षक हेमांग बदानी यांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

हेमांग बदानीने केला मोठा खुलासा

आयपीएल 2025 मेगा लिलावात 11 कोटी रुपयांची बोली लावून दिल्ली कॅपिटल्सने टी नटराजन याला संघात घेतलं. पण टी नटराजन हा फक्त दोनच सामने खेळू शकला. त्यामुळे फ्रेंचायझीचे 11 कोटी रुपये पाण्यात गेली अशी क्रीडाप्रेमींची भावना आहे. दरम्यान, हेमांग बदानी यांनी तामिळनाडू प्रीमियर लीग स्पर्धेत समालोचन करताना याबाबत खुलासा केला आहे. ‘आपण एका खेळाडूवर 11 कोटी रुपये खर्च करून त्याला बेंचवर का बसवू? आम्ही नटराजनला संघात समाविष्ट केले जेणेकरून तो मधल्या आणि शेवटच्या षटकांमध्ये गोलंदाजी करू शकेल.’

प्रशिक्षक बदानी यांनी पुढे सांगितलं की, ‘दुखापतीतून सावरल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला नव्हता. तो संपूर्ण हंगामात जखमी होता. म्हणूनच त्याला संधी दिली नाही. याच कारणामुळे नटराजन आयपीएल 2025 स्पर्धेत फक्त दोन सामने खेळला. जर तो तंदुरुस्त असता तर त्याला अधिकाअधिक संधी दिल्या असत्या.’ नटराजन दोन सामन्यात खेळला. पण एका सामन्यात तर त्याची गरजही भासली नाही. कारण हा सामना पावसामुळे रद्द झाला. म्हणजेच संपूर्ण सिझनमध्ये त्याने 3 षटकं टाकली. एका सामन्यात त्याने चार पैकी 3 षटकं टाकली आणि खूपच महागडा ठरला. त्याने एकही विकेट घेतला नाही आणि 49 धावा दिल्या. दुसरीकडे, आयपीएलच्या नियमानुसार, साखळी फेरीत तुम्ही 100 टक्क्यांपैकी किती सामने खेळता तितकेच पैसे मिळतात.