
टीम इंडिया आणि बांगलादेशमधील कसोटी मालिका येत्या 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे. या मालिकेआधी 5 सप्टेंबरपासून दुलीप ट्रॉफी होणार आहे. श्रीलंकेविरूद्धच्या वन डे मालिकेमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे दुलीप ट्रॉफीमध्य कप्टन रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळतील असं वाटत होतं. मात्र आता दुलीप ट्रॉफीचे संघ जाहीर झाल्यावर त्यामध्ये दिसून आले की दोघांचीही नावे नाहीत. यानंतर काही माजी खेळाडूंनी आपलं मत मांडताना विराट आणि रोहित यांनी दुलीप ट्रॉफी खेळायला हवी होती असं म्हटलं होतं. अशातच टीम इंडियाचा स्टार माजी खेळाडू सुरेश रैनानेही आपली प्रतिक्रिया दिली आहे.
आयपीएल संपल्यानंतर लाल बॉलने जास्त सामने खेळलेले नाहीत. एक महत्त्वाची कसोटी मालिका होणार आहे. त्याआधी चार दिवसीय क्रिकेट खेळायला हवं. सामन्याच्या चौथ्या दिवशी पिच कसे असेल याचाही सराव झाला असता. मला वाटतं की ते इतके परिपक्व झालेत की 4 ते 5 दिवसांआधी एकत्र येऊन सराव करतील. काही वेळ कुटुंबासोबत वेळ घालवणे महत्त्वाचे असते, असं सुरेश रैनाने म्हटलं आहे.
विराट आणि रोहित कानपूरमध्ये ऑक्टोबर महिन्यात खेळतील तेव्हा विकेट कठीण असेल. दव पडल्याने स्पिनर्सला जास्त मदत मिळणार नाही. स्टेडियमही गंगा नदीपासून जवळ असल्याने तिथे सकाळ थंडीही असते. बांगलादेशने आताचा पाकिस्तान संघाला त्यांच्याच घरच्या रावळपिंडीमधील कसोटी सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे बांगलादेशला हलक्यात घेतलं जावू शकत नाही. आशा आहे की एक दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल, असंही सुरेश रैना म्हणाला. सुरेश रैनाआधी सुनील गावस्कर आणि संजय मांजरेकर यांनीही विराट आणि रोहितने दुलीप ट्रॉफी खेळावी असं म्हटलं होतं. दुलीप करंडक झोनल फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आला आहे. यावेळी स्वरूप बदलले असून आता चार संघांची ही स्पर्धा करण्यात आली आहे. यावेळी भारत-अ, भारत-ब, भारत-क, भारत-ड संघांदरम्यान आयोजित केला जाईल. बेंगळुरू आणि अनंतपूरमध्ये 5 सप्टेंबरपासून पहिली फेरी होणार आहे.
दरम्यान, टीम इंडिया आणि बांगलादेशमधील पहिला कसोटी सामना चेन्नईमध्ये 19 सप्टेंबरला होणार आहे. तर दुसरा कसोटी सामना 27 सप्टेंबरला कानपूरमधील ग्रीन पार्क येथे होणार आहे. या मालिकेसाठी बीसीसीआयकडून काही दिवसातच टीम इंडियाची घोषणा केली जावू शकते.