
आयसीसी अंडर 19 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील उपांत्य फेरीतील दुसऱ्या सामन्यात अफगाणिस्तान क्रिकेट टीमने धमाका केला आहे. अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध 300 पार मजल मारली आहे. अफगाणिस्तानने भारतासमोर 311 धावांचं मजबूत आव्हान ठेवलं आहे. अफगाणिस्तानसाठी मिडल ऑर्डरमधील 2 फलंदाजांनी शतक झळकावलं. फैझल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई या दोघांनी शतकी धमाक केला. त्यामुळे अफगाणिस्तानला 300 पार मजल मारता आली. तर भारतीय गोलंदाजांनी निर्णायक सामन्यात घोर निराशा केली. आता टीम इंडिया 311 धावा पूर्ण करुन अंतिम फेरीत धडक देणार की अफगाणिस्तान फायनलचं तिकीट मिळवणार? हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.
अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय योग्य ठरवला. अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी पहिल्या 2 विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी फलंदाजांनी 148 धावांसाठी विक्रमी भागीदारी केली. त्यामुळे अफगाणिस्तानला 300 पार पोहचता आलं. ओस्मान सदात आणि खालिद अहमदझाई या सलामी जोडीने 53 धावांनी भागीदारी केली. त्यानंतर खालिद 31 धावा करुन माघारी परतला.
ओस्मान आणि फैझल शिनोजादा या दोघांना दुसऱ्या विकेटसाठी 71 बॉलमध्ये 64 रन्सची पार्टनरशीप केली. भारताने ही जोडी फोडून अफगाणिस्तानला दुसरा झटका दिला. कनिष्क चौहान याने उस्मानला दीपेश देवेंद्रन याच्या हाती कॅच आऊट केलं. उस्मानने 70 बॉलमध्ये 39 रन्स केल्या.
त्यानंतर तिसऱ्या विकेटसाठी फैझल शिनोजादा आणि उझैरुल्ला नियाझाई या जोडीने धमाका केला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी विक्रमी भागीदारी करत चौफेर फटकेबाजी केली. अफगाणिस्तानच्या या जोडीने या शतकी भागीदारी दरम्यान भारतीय गोलंदाजांची धुलाई केली. फैजलने या भागीदरम्यान शतक झळकावलं. मात्र फैझल शतकानंतर 10 धावा जोडून बाद झाला. फैझल बाद झाल्याने ही पार्टनरशीप ब्रेक झाली. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी148 रन्सची पार्टनरशीप केली. फैझलने अफगाणिस्तानसाठी सर्वाधिक धावा केल्या. फैझलने 93 चेंडूत 110 धावा केल्या. फैझलने या दरम्यान 15 चौकार लगावले.
फैझलनंतर अझीजझुल्लाह मियाखिल 12 धावांवर बाद झाला. तर उझैरुल्ला नियाझाई आणि अब्दुल अझीझ ही जोडी नाबाद परतली. अब्दुलने 7 धावा केल्या. तर उझैरुल्ला याने 86 चेंडूत 2 षटकार आणि 12 चौकारांच्या मदतीने 101 धावा केल्या. भारतासाठी दीपेश देंवेंद्रन आणि आणि कनिष्क चौहान या जोडीने प्रत्येकी 2-2 विकेट्स मिळवल्या. आता 311 धावांचा पाठलाग करताना कर्णधार आयुष म्हात्रे आणि वैभव सूर्यंवशी ही स्टार जोडी भारताला कशी सुरुवात मिळवून देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.