विराट कोहली आणि धोनी एकमेकांची भेट घेत नाहीत? थालाने मैत्रीबाबत केला मोठा खुलासा

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात विराट कोहलीने आपली मुळं घट्ट रोवली. तसेच धावांचा वर्षाव करत मागे वळून पाहिलं नाही. असं असताना या दोघांच्या मैत्रीबाबत अनेक चर्चा होत असतात. आता खुद्द महेंद्रसिंह धोनीने आपल्या मैत्रीबाबत मोठा खुलासा केला आहे. धोनीने 'थाला फॉर अ रीजन'वर हा खुलासा केला.

विराट कोहली आणि धोनी एकमेकांची भेट घेत नाहीत? थालाने मैत्रीबाबत केला मोठा खुलासा
| Updated on: Aug 03, 2024 | 7:44 PM

महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यातील मैत्री सर्वश्रूत आहे. त्यांच्या मैत्रीचे अनेक किस्से क्रीडाविश्वात चर्चेत आहेत. महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकल्यानंतर दोन्ही खेळाडू आयपीएलमध्ये चर्चा करताना दिसले. आयपीएल 2024 स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी दोन्ही खेळाडू एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून चर्चा करत होते. त्यामुळे या दोघांमधील नातं किती घट्ट आहे हे अधोरेखित होतं. क्रिकेटव्यतिरिक्त या खेळाडूंनी आपल्या वैयक्तिक आयुष्यात मैत्रीपूर्ण संबंध जपले आहेत. वेळात वेळ काढून हे खेळाडू एकमेकांची विचारपूस करतात. आता या मैत्रीपूर्ण नात्यावर महेंद्रसिंह धोनीने पहिल्यांदाच मत मांडलं आहे. माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी एका कार्यक्रमात गेला होता. त्यावेळी त्याने विराट कोहलीची स्तुती केली. विराट कोहली हा जगातील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक असल्याचं सांगितलं. तसेच टीम इंडियात एकत्रितपणे घालवलेल्या क्षणांबाबतही सांगितलं. विराट कोहलीसह मधल्या षटकात फलंदाजी करणं मजेशीर होतं. कारण दोघंही डबल आणि ट्रिपल धावा घ्यायचो. दरम्यान त्याने दोघांमध्ये जास्त काही चर्चा होत नसल्याचं सांगितलं. पण आयपीएलमध्ये चर्चा होते आणि बाजूला जाऊन बोलतो.

विराट कोहलीचा बॅड पॅच सुरु होता तेव्हा महेंद्रसिंह धोनीने त्याला फोन करून हिम्मत दिली होती. याबाबतचा खुलासा खुद्द विराट कोहलीने केला आहे. इतकंच काय तर धोनीने त्याला संघात निवडलं आणि तयार केलं, हे सांगण्यासही विसरला नाही. सुरुवातीच्या काळात फ्लॉप ठरूनही संधी दिली नाही तर करिअर संपलं होतं.

महेंद्रसिंह धोनीला कार्यक्रमात ‘थाला फॉर अ रीजन’ ट्रेंडबाबतही विचारलं गेलं. तेव्हा त्याने सांगितलं की, मला याबाबतची माहिती इंस्टाग्रामद्वारे मिळाली. त्याने चाहत्यांचे आभार व्यक्त केले. त्यांच्यामुळेच मला सोशल मीडियावर डिफेंड करण्याची गरज भासत नाही. चाहतेच काम करतात, असं सांगण्यासही विसरला नाही.

विराट कोहली सध्या श्रीलंका दौऱ्यावर असून वनडे मालिका खेळत आहे. वनडे मालिकेत श्रीलंकेविरुद्ध 1000 धावा करण्याची संधी विराटकडे आहे. सध्या विराट कोहलीने श्रीलंकेविरुद्ध 23 वनडे सामन्यात 905 धावा केल्या आहेत. 1000 धावांचा पल्ला गाठण्यासाठी 95 धावांची गरज आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us