ENG vs IND : शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज, हरमनप्रीतचा फटका आणि., कोण जिंकलं? पाहा व्हीडिओ

England Women vs India Women 3rd T20I Match Result : भारतीय महिला संघाने या 5 टी 20i मालिकेतील पहिले आणि सलग 2 सामने जिंकून 2-0 अशी आघाडी घेतली होती. त्यामुळे तिसरा सामना जिंकून मालिका विजयाची संधी होती. मात्र तिसऱ्या सामन्यातील शेवटच्या बॉलवर विजयी संघ निश्चित झाला.

ENG vs IND : शेवटच्या बॉलवर 6 धावांची गरज, हरमनप्रीतचा फटका आणि., कोण जिंकलं? पाहा व्हीडिओ
Harmanpreet Kaur WENG vs WIND 3rd T20i
Image Credit source: England Cricket X Account
| Updated on: Jul 05, 2025 | 3:18 AM

वूमन्स इंग्लंडने तिसऱ्या आणि रंगतदार झालेल्या टी 20I सामन्यात टीम इंडिया विरुद्ध शेवटच्या बॉलवर 5 धावांनी विजय मिळवला आहे. इंग्लंडने भारतासमोर 172 धावांचं आव्हान ठेवलं होतं. भारताला या विजयी धावांचा पाठलाग करताना शेवटच्या ओव्हरमध्ये 12 धावांची गरज होती. सामना शेवटच्या चेंडूपर्यंत गेला. शेवटच्या बॉलवर भारताला 6 धावांची गरज होती. कॅप्टन हरमनप्रीत कौर स्ट्राईकवर असल्याने भारतीय चाहत्यांना विजयाची आशा होती. मात्र हरमनप्रीतने निराशा केली. हरमनप्रीतने फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र फटका निट बसला नाही. त्यामुळे शेवटच्या बॉलवर हरमनप्रीत कॅच आऊट झाली. इंग्लंडने अशाप्रकारे भारतावर ‘करो या मरो’ सामन्यात 5 धावांनी विजय मिळवला आणि 5 सामन्यांच्या मालिकेतील आव्हान कायम ठेवलं. मात्र इंग्लंड या विजयानंतरही मालिकेत 1-2 अशा फरकाने पिछाडीवर आहे.

टीम इंडियाची बॅटिंग

शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने टीम इंडियाला स्फोटक सुरुवात करुन दिली. या जोडीने 80 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली. या दोघींनी पहिल्या विकेटसाठी 85 धावा जोडल्या. त्यानतंर शफाली आऊट झाली. शफालीने 25 बॉलमध्ये 7 फोर आणि 2 सिक्ससह 47 रन्स केल्या. शफालीनंतर जेमिमाह रॉडिग्स मैदानात आली.

स्मृती आणि जेमिमाह जोडीने दुसऱ्या विकेटसाठी 38 रन्सची पार्टनरशीप केली. जेमिमाह 20 रन्स करुन आऊट झाली. जेमीमाहनंतर भारताने तिसरी विकेटही लवकर गमावली. स्मृती मंधाना निर्णायक क्षणी आऊट झाली. स्मृतीने 49 चेंडूत 10 चौकारांच्या मदतीने 56 धावा केल्या.

स्मृती आऊट झाल्याने कर्णधार हरमनप्रीत कौर हीला साथ देण्यासाठी रिचा घोष मैदानात आली. मात्र रिचाने निराशा केली. रिचा 10 बॉलमध्ये 7 रन्स करुन आऊट झाली. रिचा आऊट झाल्यानंतर भारताला 9 बॉलमध्ये 18 रन्सची गरज होती. हरमनप्रीत आणि अमनज्योत कौर जोडीने 3 बॉलमध्ये 6 रन्स केल्या. त्यामुळे शेवटच्या 6 बॉलमध्ये 12 रन्स हव्या होत्या.

इंग्लंडचा शेवटच्या चेंडूवर विजय

शेवटच्या ओव्हरचा थरार

इंग्लंडच्या गोलंदाजाने पहिल्या बॉलवर हरमनप्रीतला 2 धावा करुन दिल्या. कौरने दुसऱ्या बॉलवर सिंगल घेतली. तिसऱ्या बॉलवर अमनज्योत कौरने 1 धाव काढत हरमनप्रीतला स्ट्राईक दिली. हरमनप्रीतने चौथा बॉल डॉट केला. तर पाचव्या बॉलवर 2 रन्स घेत स्ट्राईक स्वत:कडे ठेवली. आता शेवटच्या बॉल आणि 6 रन्स पाहिजे होत्या. चाहत्यांची धाकधुक वाढली होती. टीम इंडियाला विजयी हॅटट्रिकसह मालिका जिंकण्यासाठी एका मोठ्या फटक्याची गरज होती. त्यामुळे हरमनप्रीतकडे सर्वांच्या नजरा होत्या. इंग्लंडच्या गोलंदाजाने टाकलेल्या बॉलवर हरमनप्रीतने फटका मारला. मात्र हरमनप्रीत कॅच आऊट झाली. त्यामुळे भारताला 20 ओव्हरमध्ये 5 विकेट्स गमावून 166 धावांपर्यंतच पोहचता आलं.हरमनप्रीतने 17 बॉलमध्ये 23 रन्स केल्या. तर अमनज्योतने नाबाद 7 धावा केल्या.