बंगळुरु चेंगराचेंगरीचं कटू सत्य! अचानक प्लान बदलण्याचं कारण काय? पोलिसांना महिती होतं की…

आयपीएल ट्रॉफी जिंकल्यानंतर आरसीबीच्या विजयी जल्लोषात विघ्न पडलं. चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. गर्दीचा अतिरेक आणि त्या सांभाळण्यासाठी नसलेलं व्यवस्थापन यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पण या विजय जल्लोषाआधीच विक्ट्री परेड रद्द करण्यात आली होती. असं का ते जाणून घ्या.

बंगळुरु चेंगराचेंगरीचं कटू सत्य! अचानक प्लान बदलण्याचं कारण काय? पोलिसांना महिती होतं की...
बंगळुरु चेंगराचेंगरीचं कटू सत्य! अचानक प्लान बदलण्याचं कारण काय?
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Jun 04, 2025 | 9:20 PM

बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाला. तसेच अनेक जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. हा प्रकार आयपीएल 2025 च्या विजयी कार्यक्रमाच्या आधीच झाला. स्टेडियमचे गेट खुले होताच धावाधाव झाली आणि चेंगराचेंगरी झाल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे, या प्रकरणानंतर आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. सुमार व्यवस्थापन आणि प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. स्टेडियमच्या बाहेर इतकी गर्दी होती की लोकं आत जाण्यासाठी भिंतीवरून उड्या मारत होते. काही जणांनी झाडावर चढून आत जाण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रकरणाला जबाबदार कोण याचा आता तपास केला जात आहे. पण बंगळुरुची ट्राफीक व्यवस्था व्यवस्थित असती तर कदाचित हा प्रकार टाळता आला असता. त्याचं कारण असं की सुरुवातीला आरसीबी टीम शहरात ओपन बसमधून परेड करणार होती. पण शहरातील वाहतूक कोंडीची स्थिती पाहता टाळण्यात आलं. तसेच स्टेडियमच्या आतच कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेतला गेला.

विक्ट्री परेडसाठी विनंती आल्यानंतर पोलिसांनी दुपारी 3 ते रात्री 8 पर्यंत सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट भागात जाऊ नका असा सल्ला दिला होता. कारण या भागात वाहतूक कोंडी असते आणि गर्दी वाढण्याची भिती होती. इतकंच काय तर प्रवाशांना मेट्रो आणि अन्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करण्याची विनंती केली होती. कारण स्टेडियमच्या आसपास वाहनं पार्क करण्यासाठी मर्यादीत जागा आहे. त्यामुळे सर्व परिस्थिचा अंदाज घेऊन पोलिसांनी ओपन बस परेड नको म्हणून सांगितलं होतं.

बंगळुरुचे ज्वॉइंट सीपी वाहतूक विभाग एमएन अनुचेथ यांनी एका मुलाखतीत सांगितलं की, बंगळुरु सर्वाधिक वाहनं असलेलं शहर आहे. बंगळुरुची लोकसंख्या 1.5 कोटी आहे आणि वाहनांची संख्या 1.23 कोटी नोंदणीकृत आहे. म्हणजेच 1 हजार माणसांमागे 872 वाहनं आहेत. मुंबई दिल्लीच्या तुलनेत अधिक आहे. 2013 ते 2023 या कालावधीत वाहनांची संख्या 8 टक्क्यांनी वाढली. पण रस्ते आहे तसेच राहिले. 2000 सालापासून आयटी क्षेत्रात प्रगती झाल्याने या भागात झपाट्याने शहरीकरण वाढलं. पण लोकसंख्येचा अभ्यास केला गेला नाही.

बंगळुरुची वाहतूक कोंडी सोशल मीडियावर कायम चर्चेचा विषय ठरला आहे. अनेक मीम्स यावर रोज तयार होत असतात. त्यामुळे रोजच झालं आहे. मध्यंतरी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पा यानेही बंगळुरु शहर याच कारणाने सोडलं होतं. वाहतूक कोंडीच्या यादीत हे शहर तिसऱ्या स्थानावर येतं. या शहरात किमी अंतर कापण्यासाठी मिनिटांहून अधिक काळ लागतो.