
आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत आज रविवारी 1 मार्च रोजी यजमान टीम इंडिया विरुद्ध वेस्ट इंडिज आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना अतिशय निर्णायक आहे. हा सामना जिंकणारा संघ उपांत्य फेरीत पोहचेल. तर पराभूत होणाऱ्या संघाचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येईल. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात पूर्ण ताकदीने उतरणार आहेत. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून आहे. हा सामना कोलकातातील इडन गार्डन्समध्ये होणार आहे. अशात विंडीज क्रिकेटच्या वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.
श्रीलंका वूमन्स टीम सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. श्रीलंकेने या दौऱ्यात 3 सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका 2-1 अशा फरकाने जिंकली आहे. तर उभयसंघातील 3 सामन्यांच्या टी 20i मालिकेला 28 फेब्रुवारीपासून सुरुवात झाली. मात्र पावसाने यजमान विंडीजची लाज राखलीय. पावसामुळे विंडीज लाजिरवाण्या पराभवापासून वाचली. नक्की काय झालं? जाणून घेऊयात.
उभयसंघातील पहिल्या सामन्याचं आयोजन हे ग्रेनाडा येथील सेंट जॉर्जेसमधील नॅशनल क्रिकेट स्टेडियममध्ये करण्यात आलं होतं. विंडीजला या सामन्यात श्रीलंकेच्या गोलंदाजांसमोर 20 ओव्हरही खेळता आलं नाही. तसेच विंडीजला 50 धावाही करता आल्या नाहीत. श्रीलंकेने विंडीजला 13.3 ओव्हरमध्ये 49 धावांवर रोखलं. त्यामुळे श्रीलंकेला विजयासाठी 50 धावांचं सोपं आव्हान मिळालं. त्यामुळे श्रीलंका हे आव्हान सहज पूर्ण करत मोठ्या फरकाने हा सामना जिंकेल आणि मालिकेत 1-0 ने आघाडी घेईल, असं चित्र होतं. मात्र हे पावसाला मान्य नव्हतं.
पावसाने श्रीलंकेचा विजय हिसकावला!
The rain brings an end to the 1st WT20I v Sri Lanka.🌧️#WIWvSLW | #MaroonWarriors pic.twitter.com/Bs9pQA3k9h
— Windies Cricket (@windiescricket) February 28, 2026
श्रीलंकेने विजयी धावांचा पाठलाग करताना 2.5 ओव्हरपर्यंत बिनबाद 7 धावा केल्या होत्या. मात्र त्यानंतर वरुणराजा वेस्ट इंडिजच्या मदतीला धावून आला. श्रीलंकेची बॅटिंग सुरु असताना पावसाने बॅटिंगला सुरुवात केली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. त्यानंतर बराच वेळ चाहत्यांना खेळाची सुरुवात होण्याची प्रतिक्षा होती. मात्र कसलं काय. पावसाने बॅटिंग सुरुच ठेवली होती. त्यामुळे अखेर हा सामना रद्द करण्यात येत असल्याचं जाहीर करण्यात आलं. त्यामुळे श्रीलंकेची मोठी संधी पावसाने हिसकावली. तर पावसाने विंडीजची लाज राखली.
दरम्यान आता मालिका जिंकण्यासाठी दोघांपैकी एका संघाला उर्वरित 2 सामने जिंकावे लागणार आहे. त्यामुळे या मालिकेचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.