Vaibhav Sooryavanshi: थोडं शिक आधी मग खेळ…सगळ्या जगाला वैभवचं कौतुक असताना असं कोण म्हणाले?
Vaibhav Sooryavanshi Duleep Trophy Final: वैभव सूर्यवंशी ज्या पद्धतीने खेळतो लोक त्याचे भरपूर कौतुक करतात, पण माजी क्रिकेटपटूने एक विधान केले त्याची आता जोरदार चर्चा रंगली आहे.

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात, इशान किशनने ३० चौकार आणि ७ षटकारांसह ३३४ चेंडूंमध्ये २७० धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीमुळे ईस्ट झोनला पहिल्या डावात ७०८ धावा करता आल्या आणि अंतिम सामन्यात विजयाच्या दिशेने वाटचाल करता आली. माजी क्रिकेटपटूंनी इशानच्या खेळीला सर्वोत्कृष्ट म्हणून गौरवले आहे आणि याचेच उदाहरण देत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला धारेवर धरले आहे.
वैभव सूर्यवंशीने ईस्ट झोनच्या डावाची सुरुवात केली आणि ३७ चेंडूंमध्ये ४४ धावा केल्या. सामन्यादरम्यान, भारताचा माजी खेळाडू विवेक राजदानने वैभव सूर्यवंशीसाठी एक खास संदेश दिला. समालोचनादरम्यान राजदान म्हणाला, “सूर्यवंशी सर, आता तुम्हाला इशान किशनसारख्या खेळाडूंकडून शिकावं लागेल. एकदा तुम्ही स्थिरावलात की, तुम्हाला मोठी खेळी करायला शिकावे लागेल.”
माजी भारतीय क्रिकेटपटू विवेक राजदान पुढे म्हणाले, “येथील प्रत्येकाने उभे राहून या खेळीला टाळ्या वाजवून दाद दिली, कारण हा केवळ तंत्र किंवा मानसिकतेचा प्रश्न नाही, तर तो सामन्यासाठीच्या तंदुरुस्तीचाही प्रश्न आहे. एवढ्या उन्हात इतका वेळ क्रीजवर टिकून राहणे आणि अशी खेळी खेळणे… ईशान किशनची काय शानदार खेळी आहे. वैभवने त्याच्याकडून शिकले पाहिजे.”
वैभवने दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात ९२ धावा केल्या होत्या. फायनल सामन्यात पहिल्या डावात वैभवला त्याचे अर्धशतकही पूर्ण करता आलेले नाही. त्याची आक्रमक फलंदाजीची शैली ही त्याची ओळख बनली आहे, पण आता माजी क्रिकेटपटू त्याला मोठी खेळी खेळण्याचा सल्ला देत आहेत. माजी क्रिकेटपटूंच्या मते, जर वैभवला भविष्यात कसोटी सामने खेळायचे असतील, तर त्याला देशांतर्गत क्रिकेटमध्ये अशा सामन्यांमध्ये मोठी खेळी खेळण्याची गरज आहे, ज्यामुळे त्याला कसोटी सामने खेळण्याचा मार्ग मोकळा होईल.
दुलीप ट्रॉफीचा या हंगामात वैभवने ४६ च्या सरासरीने १८४ धावा केल्या आहेत. इशान किशनने चार डावांमध्ये १०९ च्या सरासरीने ३२९ धावा जमवून दुलीप ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत.