
आजपासून भारत-ऑस्ट्रेलियामध्ये T20 सीरीज सुरु होत आहे. माजी ऑलराऊंडर इरफान पठाणच्या मते, हार्दिक पंड्याला झालेल्या दुखापतीचा टीम इंडियाच्या संतुलनावर परिणाम होईल. आशिया कप दरम्यान हार्दिक पंड्याच्या डाव्या मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध तो फायनल मॅच खेळू शकला नव्हता. अजूनपर्यंत तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करु शकलेला नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत आशिया कपच्या फायनलमध्ये शिवम दुबेकडे नवा चेंडू सोपवावा लागला होता. “हार्दिकच्या दुखापतीमुळे टीमचा बॅलन्स बदलला आहे. आता नव्या चेंडूने गोलंदाजी कोण करणार? आशिया कपच्या फायनलमध्ये शिवम दुबेने ओपनिंग केली. ऑस्ट्रेलियातही तेच होणार का?” असं इरफान पठाण त्याच्या युट्यूब चॅनलवर म्हणाला.
“ऑस्ट्रेलियात तीन वेगवान गोलंदाजांची गरज असते. कारण तिथे स्पिनर्सची भूमिका मर्यादीत असते. ऑस्ट्रेलियात तीन पेस गोलंदाज हवेत. दुबईप्रमाणे तिथे तीन स्पिनर्सची आवश्यकता नाही. मी तीन वेगवान गोलंदाज आणि एका स्पिनरसोबत जाईन” असं इरफान म्हणाला.
इरफानची प्लेइंग 11
अभिषेक शर्मा, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, अक्षर पटेल, हर्षित राणा, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती. इरफाननुसार, या टीममध्ये नंबर 8 पर्यंत फलंदाज आहेत. गोलंदाजीमध्ये सुद्धा चांगली वरायटी मिळते.
या दोघांपैकी एकाची निवड करणं कठीण
कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती दरम्यान निवड कोणाची करायची? हा निर्णय कठीण असेल, असं इरफानला वाटतं. “दोघांपैकी कोणा एकाची निवड करणं, सोपं नाही. भारताला पावरप्लेमध्ये स्पिन गोलंदाजीचा वापर करायचा असेल, तर मी वरुणची निवड करीन,कारण त्याच्याकडे मिस्ट्री फॅक्टर आहे. कुलदीपची निवड केली, तरी हरकत नाही” असं इरफानने सांगितलं.