Hockey World Cup 2026 उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर कोणत्या अडचणी? कसं सोडवणार गणित

पुरूष हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या साखळी फेरीत भारताने जबरदस्त कामगिरी केली आणि दुसऱ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. पण नव्या फॉर्मेटमुळे भारताचं उपांत्य फेरीचं गणित किचकट झालं आहे. भारताने नेदरलँड किंवा अर्जेंटिना यांच्यापैकी किमान एका संघाला मोठ्या फरकाने पराभूत करावं लागेल. इतकंच काय तर नेदरलँडविरुद्धचा सामना खूपच महत्त्वाचा आहे. 

Hockey World Cup 2026 उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर कोणत्या अडचणी? कसं सोडवणार गणित
Hockey World Cup 2026 उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी भारतासमोर कोणत्या अडचणी? कसं सोडवणार गणित
Image Credit source: Hockey India Twitter
| Updated on: Aug 21, 2026 | 9:10 PM

पुरूष हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धा आता रंजक वळणावर आली आहे. साखळी फेरीचे सामने संपले असून नव्या फॉर्मेटनुसार क्रॉसओव्हर फेरी होणार आहे. या वर्षी उपांत्यपूर्व फेरीचे सामने रद्द केले असून क्रॉसओव्हर फेरी असणार आहे. भारत, इंग्लंड, नेदरलँड आणि अर्जेंटिना हे क्रॉसओव्हर फेरीतील पूल ई गटात भिडणार आहेत. पूल ए मधील टॉप-2 संघ असलेले नेदरलँड्स, अर्जेंटिना आणि पूल डी मधील टॉप-2 संघ इंग्लंड, भारत मिळून हा गट तयार झाला आहे. नियमानुसार, या टप्प्यात जुन्या गटातील संघाविरुद्ध पुन्हा सामना खेळावा लागत नाही. त्यामुळे भारताचा सामना फक्त नेदरलँड आणि अर्जेंटिनाशी होणार आहे. तसंच इंग्लंडही नेदरलँड आणि अर्जेंटिनाविरुद्ध खेळणार आहे. या गटात टॉपला असलेल्या दोन संघांना उपांत्य फेरीचं तिकीट मिळणार आहे.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी भारतासमोर मोठी अडचण

साखळी फेरीत भारताने जबरदस्त सुरूवात केली. पहिल्या सामन्यात वेल्सला 3-1 ने पराभूत केलं. तर इंग्लंडकडून 4-2 पराभव सहन करावा लागला. तर पाकिस्तानला 5-3 पराभवाची धूळ चारत क्रॉसओव्हर फेरी गाठली. पण साखळी फेरीत भारतीय संघ दुसर्‍या स्थानावर राहिला त्यामुळे क्रॉसओव्हर फेरीत जाण्यापूर्वी नुकसान झालं आहे. कारण या गटात टॉपला असलेला इंग्लंड संघ अजिंक्य राहिला. पहिल्या टप्प्यात म्हणजेच पूल डी मध्ये इंग्लंडने भारताचा 4-2 असा पराभव केला होता. या विजयामुळे इंग्लंडला मिळणारे 3 गुण आणि 2 गोल फरक नवीन ‘पूल ई’ च्या गुणतालिकेत थेट जमा झाले आहेत. भारताचा त्या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताच्या खात्यात 0 गुण आणि -2 गोल फरक आहे.

भारताला उपांत्य फेरी गाठायची असेल तर नेदरलँड आणि अर्जेंटिना या दोन्ही संघांना पराभूत करणं सर्वोत्तम मार्ग आहे. भारताने दोन्ही सामने जिंकले तर 6 गुण होतील आणि उपांत्य फेरी गाठेल. भारताने एका सामन्यात विजय मिळवला आणि दुसरा सामना ड्रॉ केला, तर भारताचे 4 गुण होतील. अशा वेळी भारताचे नशीब इतर संघांच्या सामन्यांवर अवलंबून राहील. भारताने नेदरलँड्सला हरवून अर्जेंटिनासोबत ड्रॉ केल्यास हे गणित सोपं होईल. शेवटच्या सामन्यात इंग्लंडने नेदरलँड्सला हरवले किंवा सामना ड्रॉ झाला तर भारतला संधी मिळेल. कारण तसं झालं तर या गटात भारत दुसऱ्या स्थानावर राहील.

भारत सध्या -2 गोल फरकासह मागे असून हा फरक भरणंही महत्त्वाचा आहे.. त्यामुळे भारताला ज्या सामन्यात विजय मिळेल, त्या सामन्यात 3-0 किंवा 4-1 गोल फरकाने जिंकावा लागेल. दरम्यान, भारताचा पहिला सामना नेदरलँडविरुद्ध होत आहे. भारताचा नेदरलँड्सविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात पराभव झाला, तर नेदरलँड्सचे 6 गुण होतील. इंग्लंडचे आधीच 3 गुण आहेत, अशा स्थितीत भारताचं आव्हान जवळपास संपुष्टात येईल. त्यामुळे 22 ऑगस्टला नेदरलँडविरुद्ध होणारा सामना करो या मरोची लढाई आहे.

भारताचे सामने

  • 22 ऑगस्ट 2026 (शनिवार): भारत विरुद्ध नेदरलँड्स (संध्याकाळी 7:30 वाजता)
  • 24 ऑगस्ट 2026 (सोमवार): भारत विरुद्ध अर्जेंटिना (संध्याकाळी 6:15 वाजता)
Loading...
Unable to load recommendations.
Follow Us