जाडेजाने 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा जागवल्या, पण भीती होती तेच झालं!

| Updated on: Jul 10, 2019 | 8:02 PM

विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (दुसरा सेमीफायनल) विजेत्या संघासोबत न्यूझीलंडची फायनलमध्ये लढत रंगणार आहे.

जाडेजाने 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा जागवल्या, पण भीती होती तेच झालं!
Follow us on

लंडन : महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जाडेजा यांच्या शतकी भागीदारीनंतरही भारतीय संघाला सेमीफायनलमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. यासोबतच या विश्वचषकातील भारतीय संघाचा प्रवासही इथेच संपला. विश्वचषकाच्या सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडने भारतावर 18 धावांनी मात केली आणि फायनलचं तिकीट मिळवलं. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यातील (दुसरा सेमीफायनल) विजेत्या संघासोबत न्यूझीलंडची फायनलमध्ये लढत रंगणार आहे. 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला सर्वबाद 221 धावांपर्यंत मजल मारता आली.

भारतीय संघाची सुरुवातीची अवस्था पाहता एवढ्या धावा करता येतील, असा अंदाजही कुणी लावत नव्हतं. पण रवींद्र जाडेजा मैदानात उतरला आणि त्याने 130 कोटी भारतीयांच्या अपेक्षा जागवल्या. धोनीसोबत मिळून त्याने भारताला विजयाच्या अत्यंत जवळ नेलं. पण फॉर्मात असलेला गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या उर्वरित एकमेव षटकाची भीती होती आणि नेमकी नको ती गोष्ट घडली. एक मोठा फटका मारण्याच्या नादात जाडेजा बाद झाला आणि भारतीयांच्या अपेक्षा मावळल्या. दुसरीकडे धोनीही फलंदाजी करत होता, मात्र तो धावबाद झाला.

या विश्वचषकात जाडेजाला जिथे संधी मिळाली, त्याचं त्याने सोनं केलं. जाडेजा अनेकदा क्षेत्ररक्षणासाठी मैदानात आला, पण यावेळी त्याने कमालीची कामगिरी केली. अगोदर क्षेत्ररक्षण करताना धावा वाचवल्या, गोलंदाजीही उत्कृष्ट केली आणि कधीही न विसरता येणारी फलंदाजीही त्याने केली. जाडेजाने न्यूझीलंडचा सेट फलंदाज रॉस टेलरला धावबाद केलं होतं. शिवाय न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यम्सन आणि टॉम लेथम यांचा झेलही घेतला होता. शिवाय गोलंदाजीही अत्यंत चांगली केली. 10 षटकात केवळ 34 धावा देत न्यूझीलंडचा सलामीवीर निकोल्सला माघारी पाठवलं.

विश्वचषकात आठव्या क्रमांकावर अर्धशतक ठोकणारा पहिला फलंदाज

रवींद्र जाडेजाने विश्वचषकाच्या नॉकआऊट सामन्यात आठव्या क्रमांकावर येऊन अर्धशतक ठोकत नवा विक्रम नावावर केलाय. न्यूझीलंडविरुद्ध त्याने 59 धावांची खेळी केली. याला 4 चौकार आणि 4 षटकारांचा साज होता. जाडेजा फलंदाजीसाठी आला तेव्हा भारताची अवस्था 6 बाद 92 धावा अशी होती.

न्यूझीलंडविरुद्ध यापूर्वीही अर्धशतक

ऑकलंडमध्ये पाच वर्षांपूर्वी आठव्या क्रमांकावर फलंदाजी करताना जाडेजाने 45 चेंडूत 66 धावांची खेळी केली होती. या सामन्यात भारतीय संघ 315 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत होता. विजयासाठी 86 चेंडूत 136 धावांची आवश्यकता असताना जाडेजा मैदानात आला. या सामन्यात आर अश्विननेही चांगली फलंदाजी केली आणि हा सामना टाय झाला.