‘एमसीए’च्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, अध्यक्ष विजय पाटील आणि विश्वस्तांमध्ये शाब्दिक चकमक?

| Updated on: Aug 19, 2020 | 12:06 PM

तीन तास चाललेल्या या बैठकीत शेवटच्या सत्रात पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्याने शेवटी अध्यक्ष विजय पाटील बैठकीतून निघून गेले, अशी माहिती आहे.

एमसीएच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद, अध्यक्ष विजय पाटील आणि विश्वस्तांमध्ये शाब्दिक चकमक?
Follow us on

मुंबई : ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ अर्थात ‘एमसीए’च्या बैठकीत पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाद वाढत गेल्याने एमसीए अध्यक्ष विजय पाटील बैठकीतून निघून गेल्याचे बोलले जाते. अध्यक्ष विजय पाटील आणि विश्वस्त शाह आलम शेख यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाल्याची माहिती आहे. (Rift between Vijay Patil and Shah Alam Shaikh in MCA Meeting)

वानखेडे स्टेडियममध्ये ‘एमसीए’ बांधत असलेल्या म्युझियमसाठी एक समिती नेमण्यात आली आहे. म्युझियम बांधण्याच्या समितीत अध्यक्ष विजय पाटील, संचालक सदस्यांपैकी दिलीप वेंगसरकर, रवी सावंत, प्रोफेसर शेट्टी आणि सी. एस. नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र या समितीत सचिव संजय नाईक आणि विश्वस्त शाह आलम शेख यांचा समावेश नसल्याने वाद झाल्याची माहिती आहे.

एमसीएचे अध्यक्ष विजय पाटील विरुद्ध शाह आलम शेख अशी शाब्दिक चकमक झाली. बैठकीत विश्वस्त सदस्य किरण पवार यांनीही सेक्रेटरी संजय नाईक यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला. संजय नाईक ‘मुंबई क्रिकेट असोसिएशन’ ही स्वतःची खाजगी मालमत्ता असल्याप्रमाणे कामकाज करत आहेत, असा आरोप किरण पवार यांनी केला.

जवळपास तीन तास चाललेल्या या बैठकीत शेवटच्या सत्रात पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. वाद वाढत गेल्याने शेवटी अध्यक्ष विजय पाटील बैठकीतून निघून गेले, अशी माहिती आहे.

बैठकीत तीन महत्वाच्या विषयांवर निर्णय

1) क्रिकेट इम्प्रुव्हमेंट कमिटीवर लालचंद राजपूत, समीर दिघे आणि राजू कुलकर्णी यांची निवड करण्यात आली.

2) सुनील गावस्कर यांच्या क्रिकेट कारकिर्दीला 6 मार्च 2021 रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत. त्याबद्दल त्यांचा सत्कार आणि वानखेडे स्टेडियममध्ये त्यांना आसन व्यवस्थेचा एक वातानुकूलित कक्ष देणे.

3) वानखेडे स्टेडियममध्ये नॉर्थ स्टॅण्डच्या तीन कक्षांना दिलीप वेंगसरकर यांचे नाव देणे.

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याच्या भारतीय क्रिकेटमधील योगदानासाठी त्याच्या नावाने वानखेडे स्टेडियममध्ये कायमस्वरुपी आसन राखीव ठेवण्याची मागणी झाली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे विश्वस्त अजिंक्य नाईक यांनी ही मागणी केली आहे. याबाबत त्यांनी मुंबई असोसिएशनला त्याबाबत पत्रही लिहिलं आहे.