Sunil Gavaskar: जर असंच नीट खेळायचे असेल तर… सुनील गावस्करांनी कोणाला दिला सल्ला?
Sunil Gavaskar: भारताचे माजी दिग्गज फलंदाज सुनील गावस्कर यांनी संजू सॅमसनबद्दल एक विधान केले आहे ज्याची चर्चा आता सुरु आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील टी-२० मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात संजू सॅमसनने शानदार अर्धशतक झळकावले. त्याने २२ चेंडूंमध्ये ५७ धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे भारताला ७ गडी राखून विजय मिळवता आला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेता आली.
या सामन्यापूर्वी संजू सॅमसनच्या जागी वैभव सूर्यवंशीला संघात स्थान देण्याची चर्चा होती. सॅमसनने शानदार अर्धशतक झळकावून आपल्या टीकाकारांची तोंडे बंद केली. आता सुनील गावस्कर यांनी त्याला सल्ला दिला आहे की, अफगाणिस्तानविरुद्ध ज्याप्रकारे फलंदाजी केली, तशीच फलंदाजी करत राहिल्यास तो कधीही बाद होणार नाही.
संजू सॅमसनने टी-२० विश्वचषकानंतर आपले पहिले अर्धशतक झळकावले. टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ८९ धावा करणारा सॅमसन आयर्लंडविरुद्धच्या दोन्ही सामन्यांमध्ये अपयशी ठरला होता. तसेच तो इंग्लंडविरुद्धच्या दोन सामन्यांमध्येही अपयशी ठरला होता.
सुनील गावस्कर म्हणाले, "कधीकधी सातत्य हवे असते, आणि २० षटकांच्या सामन्यात सलामीवीरांना जास्त स्ट्राईक मिळत असल्यामुळे, त्यांना धावा करण्याची सर्वाधिक संधी मिळते. आज, सॅमसन क्रीजवर स्थिरावला आणि मग मोठे फटके खेळायला लागला. जर तो असाच खेळत राहिला, तर मला नाही वाटत की तो कधी अपयशी ठरेल."
संजू प्रत्येक वेळी अर्धशतके आणि साठच्या धावा करत राहील. तो फक्त तेव्हाच बाद होतो, जेव्हा तो पहिल्या चेंडूपासून स्फोटक खेळी करण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्ही १९० किंवा २०० धावांचा पाठलाग करत असाल, तर तुम्हाला ते करावेच लागते; ते करण्याशिवाय दुसरा पर्याय नसतो. पण तो एक उत्कृष्ट खेळाडू आहे."