ज्या गाण्याला आनंद बख्शीने मानलं होतं दुर्दैवी, त्याच गाण्याने धर्मेंद्र-हेमा मालिनीची जोडी गाजवली
ज्या गाण्याला आनंद बख्शीने मानलं होतं दुर्दैवी, त्याच गाण्याने धर्मेंद्र-हेमा यांच्या जोडीला बनवलं सुपरहिट. लता मंगेशकर यांच्या आवाजामुळे गाणं ठरलं प्रचंड लोकप्रिय.

हिंदी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गीतकार आनंद बक्षी यांनी आपल्या सुंदर आणि भावस्पर्शी गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले. ‘मेरे नैना सावन भादों’, ‘चिट्ठी आई है’ आणि ‘चांद सी महबूबा हो मेरी’ यांसारख्या गाण्यांमधून त्यांनी प्रेम, विरह आणि आयुष्याच्या भावनांना शब्द दिले. मात्र, एक काळ असा होता, जेव्हा स्वतःच्या आवाजात गायलेल्या एका गाण्यामुळे त्यांच्या मनात अंधश्रद्धेसारखी धारणा निर्माण झाली होती. याच धारणेचा संबंध 1976 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चरस’ चित्रपटातील ‘आ जा तेरी याद आई’ या गाजलेल्या गाण्याशी आहे.
‘चरस’ चित्रपटाचे लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन रामानंद सागर यांनी केले होते. या चित्रपटाच्या निर्मितीशी संबंधित अनेक किस्से त्यांचे पुत्र प्रेम सागर यांनी ‘एन एपिक लाइफ रामानंद सागर, फ्रॉम बरसात टू रामायण’ या पुस्तकात सांगितले आहेत.
या पुस्तकातील माहितीनुसार, आनंद बक्षी यांनी यापूर्वी ‘मोम की गुड़िया’ चित्रपटासाठी दोन गाणी गायली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. त्यानंतर बक्षी यांच्या मनात त्यांनी गायलेले गाणे अनलकी ठरल्याची धारणा निर्माण झाली होती.
गाण्याच्या सुरुवातीला धार्मिक सीन दाखवण्याची विनंती
‘चरस’ चित्रपटातील ‘आ जा तेरी याद आई’ या गाण्याची रेकॉर्डिंग सुरू असताना आनंद बक्षी यांनी रामानंद सागर यांच्यासमोर एक खास विनंती केली. त्यांच्या आवाजाचा भाग सुरू होताना चित्रपटात धार्मिक सीन दाखवावीत अशी त्यांची इच्छा होती.
त्यानुसार, गाण्याच्या सुरुवातीला आनंद बक्षी यांचा आवाज ऐकू येतो, तेव्हा पडद्यावर मदर मेरी आणि येशू ख्रिस्त यांच्या प्रतिमा व सीन दाखवण्यात आली आहेत. या दृश्यांमागे बक्षी यांच्या मनातील धारणा आणि नकारात्मकता दूर करण्याची त्यांची इच्छा असल्याचे सांगितले जाते.
आजही ‘आ जा तेरी याद आई’ हे गाणे आपल्या सुरेल चालीसाठी, लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजासाठी आणि चित्रपटातील भावनिक सादरीकरणासाठी लक्षात राहते. या गाण्यामागील आनंद बक्षी यांची रंजक कहाणी जुन्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणींना उजाळा देते.
