PoK पाकिस्तानाला देण्याची होती तयारी, भाजपच्या खासदाराचा मोठा दावा
BJP Nishikant Dubey on Congress over PoK: भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी UPA सरकारसह काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. जुलै 2006 मध्ये मुंबई लोकलमधील बॉम्बस्फोटानंतरच्या भूमिकेवरून त्यांनी विरोधी पक्षावर गंभीर आरोप केला.

जुलै 200 मध्ये मुंबई लोकलमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. त्यावरून भारतीय जनता पक्षाचे खासदार निशिकांत दुबे यांनी बुधवारी संयुक्त पुरोगामी आघाडी(UPA) आणि काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. युपीए सरकारची भूमिका आणि सध्याच्या एनडीए सरकारच्या भूमिकेची तुलना त्यांनी एका पोस्टमध्ये केली. 2006 मध्ये पाकिस्तानवर लष्करी कारवाई करण्याऐवजी अमेरिकेच्या दबावापुढे तत्कालीन सरकारने गुडघे टेकले. हवाना बैठकीत काँग्रेसने पाकव्याप्त काश्मीर, कारगिल आणि सर क्रिक हा भाग पाकिस्तानाला सोपवण्याची तयारी केली होती असा गंभीर आरोप दुबे यांनी केला आहे.
काँग्रेस अमेरिकेच्या दबावाखाली
दुबे यांनी 16 सप्टेंबर 2006 रोजी हवाना येथे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांच्यात द्विपक्षीय बैठक झाली होती. या बैठकीचा उल्लेख करत ही बैठक अमेरिकेच्या दबावाखाली झाल्याचा दावा त्यांनी केला. जुलै 2006 मध्ये मुंबई लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात जवळपास 200 लोकांचा मृत्यू झाला होता. तर काही जण कायमचे अपंग झाले. देशात पाकिस्तानविरोधात संताप होता. पण काँग्रेस सरकार अमेरिकेच्या दबावाखाली होते. पाकिस्तानला धडा शिकवण्याऐवजी काँग्रेस नेतृत्वाने ऑगस्ट महिन्यातील बैठकीत चर्चेवर भर दिला आणि बोटचेपी धोरण स्वीकारल्याचा आरोप दुबे यांनी केला.
विकलीक्सच्या दाव्याआधारे खुलासा
विकलीक्सच्या दाव्याआधारे दुबे यांनी हा आरोप केला. युपीएचे नेतृत्व अमेरिकेच्या दबावाखाली एका राजनैतिक करारातंर्गत पाकव्याप्त काश्मीर, सर क्रीक आणि कारगिल पाकिस्तानला सोपवण्याच्या तयारी होते, असा दुबे यांचा आरोप आहे. 22 सप्टेंबर 2026 रोजी वॉशिग्टंनमध्ये अमेरिकेचे राष्ट्रपती जॉर्ज डब्ल्यू बुश आणि दक्षिण आशियातील नेत्यांमध्ये बैठक झाली. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग आणि परवेज मुशर्रफ यांच्यात ही बैठक झाली. त्यातील ही माहिती विकलीक्समुळे समोर आल्याचा दावा दुबे यांनी केला आहे.
त्यांनी याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. 2025 मध्ये पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला. तेव्हा मोदी सरकारने ऑपरेशन सिंदूर चालवले. यामध्ये पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांवर मोठा हल्ला करण्यात आला, त्यानंतरच्या संघर्षातही पाकिस्तानला मोठा धडा शिकवण्यात आल्याचे दुबे म्हणाले.
