
टीम इंडियाने काल टी20 वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला 96 धावांनी पराभूत केलं. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने ट्रॉफी उंचावताच सगळ्या देशाने एकच जल्लोष केला. टीम इंडियाच्या प्रत्येक चाहत्याने काल विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. टीम इंडिया ही क्रिकेट विश्वातील तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकणारी एकमेव टीम आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाने फायनलमध्ये न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. टॉस जिंकून न्यूझीलंडने प्रथम भारताला फलंदाजीला आमंत्रित केलं. टीम इंडियाने 20 ओव्हर्समध्ये 20 ओव्हर्समध्ये 5 बाद 255 धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा डाव 19 ओव्हरमध्ये 159 धावांवर आटोपला.
फायनल मॅचआधी टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन काय असेल? यावर जोरदार चर्चा रंगली होती. कारण अनेक क्रिकेट पंडितांकडून दोन खेळाडूंना वगळण्याचा सल्ला दिला जात होता. एक म्हणजे अभिषेक शर्मा आणि दुसरा वरुण चक्रवर्ती. कारण हे दोन्ही खेळाडू फ्लॉप होते. वर्ल्ड कपमध्ये त्यांच्याकडून अपेक्षित कामगिरी होत नव्हती. अभिषेक शर्मा तर तीनवेळा शुन्यावर आऊट झाला. अपवाद फक्त झिम्बाब्वे विरूद्धच्या सामन्याचा. त्याचं सामन्यात त्याने अर्धशतकं फटकावलेलं. वरुण चक्रवर्तीने इंग्लंड विरुद्ध सेमीफायनल सामन्यात 4 ओव्हरमध्ये 64 धावा दिल्या होत्या. त्यामुळे या दोघांना प्लेइंग इलव्हेन बाहेर करण्याची मागणी होत होती.
गावस्कर काय म्हणालेले?
अभिषेक शर्माबाबत बोलताना सुनील गावस्कर म्हणाले की, “त्याच्या आधीच्या चुकांमधून काही शिकलेला नाही. त्याच पद्धतीने तो आऊट होतोय” “ कठीण निर्णय आहे. अभिषेक शर्मा आयसीसी टी20 रँकिंगमध्ये नंबर 1 फलंदाज आहे. पण तो त्याच्या चुकांमधून काही शिकलेला नाही. तो सारखा त्याच भागात आऊट होतोय” असं सुनील गावस्कर इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले होते. “अभिषेक शर्मा सारखा ज्या भागात आऊट होतोय, गोलंदाज त्याच पद्धतीची बॉलिंग करुन त्याला चुका करायला भाग पाडतायत. माझी चिंता ही आहे की, त्याने अजून जुळवून घेतलेलं नाही किंवा त्याला त्याच्या भूमिकेत बदल करता येत नाहीय” असं गावस्कर म्हणालेले.
तर ती मोठी चूक ठरली असती
“अभिषेक शर्माच्या जागी रिंकू सिंहला आणून इशान किशनला संज सॅमसनसोबत ओपनिंगला पाठवा” असा सल्ला सुनील गावस्कर यांनी दिला होता. त्याशिवाय वरुण चक्रवर्तीच्या जागी कुलदीप यादवला खेळवण्याचा सल्ला सुद्धा काही क्रिकेट एक्सपर्ट्नसनी दिला होता. पण हेड कोच गौतम गंभीर आणि कॅप्टन सूर्यकुमार यादवने अभिषेक आणि वरुण दोघांवर विश्वास कायम ठेवला. कालच्या फायनलमध्ये अभिषेकने त्याच्यावरील विश्वास सार्थ ठरवला. अभिषेक शर्माने 21 चेंडूत 52 धावा फटकावत टीम इंडियाला जोरदार सुरुवात करुन दिली. या खेळीत त्याने सहा फोर आणि तीन सिक्स मारले. वरुण चक्रवर्तीने 3 ओव्हरमध्ये 39 धावा देऊन एक विकेट काढला. सुनील गावस्कर यांचा अभिषेक शर्माच्या बाबतीत सल्ला ऐकला असता तर ती मोठी चूक ठरली असती.