Sunil Gavaskar: भारतात हे घडलं असतं तर…गावस्कर ICCवर संतापलं, एका झटक्यात केली पोलखोल
Sunil Gavaskar To ICC: माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. यामुळे थेट त्यांनी आयसीसीलाच जाब विचारला आहे.

माजी भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ऑस्ट्रेलियातील कसोटी सामन्यांवर आता आयसीसीने काहीच प्रतिक्रिया दिली नाही. आयसीसीच्या या मौनवर आता सुनील गावस्कर प्रचंड भडकले आहेत. गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामने दोन दिवसांपेक्षा कमी कालावधीत संपले आहेत, परंतु आयसीसीने याकडे लक्ष दिलेले नाही. आता यावरच गावस्कर यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
गावस्कर म्हणाले की, “जर असे उपखंडात घडले असते, तर खेळपट्ट्यांवर कारवाई झाली असती. ” नुकतेच, यजमान संघाने बांगलादेशला दोन्ही डावांत १०० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा कसोटी सामना एक डाव आणि ५१ धावांनी जिंकला. यामुळे मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली. स्पोर्टस्टारमधील आपल्या स्तंभात गावस्कर यांनी लिहिले, “गेल्या काही वर्षांत ऑस्ट्रेलियात चार कसोटी सामने दोन दिवसांत संपले आहेत. असे असूनही, जेव्हा सामने लवकर संपतात तेव्हा भारतीय खेळपट्ट्यांइतकी टीका त्या खेळपट्ट्यांवर झालेली नाही. गेल्या वर्षी, पर्थ आणि मेलबर्न येथे खेळल्या गेलेल्या ॲशेस मालिकेतील दोन कसोटी सामनेही दोन दिवसांत संपले होते.”
गावस्कर यांनी त्यांच्या स्तंभात पुढे लिहिले, “ऑस्ट्रेलियातील आणखी एक कसोटी सामना दोन दिवसांत संपला आहे; गेल्या काही वर्षांत असे चार वेळा घडले आहे. तरीही, ज्या खेळपट्ट्यांवर अतिरिक्त उसळी असते आणि ज्यामुळे असे निकाल लागतात, त्यांच्यावर कोणतीही टीका झालेली नाही. लवकरच सबबी पुढे येतील, की ग्राऊंड्समनने—माफ करा, ‘टर्फ एक्झिक्युटिव्ह’ने—चूक केली. हवामान अंदाजानुसार उष्णता असणार होती, म्हणून त्यांनी थोडे जास्त गवत ठेवले आणि त्यामुळेच इतकी उसळी आली.”
सध्या भारत आणि श्रीलंका यांच्यात कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. ही कसोटी मालिका श्रीलंकामध्ये सुरु आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना पार पडला असून आता दुसरा कसोटी सामना सुरु आहे. पहिला सामना भारतीय संघाने जिंकला, आता दुसरा कसोटी सामनाही भारतीय संघ जिंकेल अशी चिन्हे दिसत आहेत.