
अखेर पाकिस्तान सरकारने आपला निर्णय बदलला आणि टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारताविरुद्ध खेळण्यास हरकत नाही असे सांगितले. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील अत्यंत रोमांचक आणि हाय-व्होल्टेज सामना नियोजित वेळेनुसार १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. आशिया कपच्या फायनलनंतर प्रथमच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर येणार आहेत. भारतीय संघ आपली विजयी मालिका कायम राखण्यासाठी प्रयत्न करणार आहे. तर पाकिस्तान संघ मागील पराभवाचा बदला घेण्याच्या जिद्दीने मैदानात उतरणार आहे. दरम्यान, एक मोठे संकट आल्याचे म्हटले जात आहे.
कोलंबोमधील हवामान काय सांगते?
कोलंबोतील हवामान सध्या अस्थिर आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी रोजीही दिवसभर सुमारे १७ टक्के पावसाची शक्यता वर्तवली जात आहे. वाऱ्याचा वेगही २८ किमी/तास पर्यंत पोहोचू शकतो. मात्र, क्रिकेटप्रेमींना दिलासा देणारी बातमी ही की, सायंकाळी सामन्याच्या वेळेत (T20 सामन्याची वेळ) पावसाची शक्यता खूपच कमी आहे. अशा स्थितीत पूर्ण सामना निर्धारित वेळेत पूर्ण होण्याची शक्यता जास्त आहे आणि चाहत्यांना रोमांचक सामना पूर्ण पाहण्याची संधी मिळू शकते.
भारत vs पाकिस्तान: हेड-टू-हेड रेकॉर्ड
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत १३ सामने खेळले गेले आहेत. यातील १० सामने भारताने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला फक्त ३ विजय मिळाले आहेत. मागील आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग तीन विजय नोंदवले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ पुन्हा एकदा आपला दबदबा कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल.
भारतीय संघ (टी-२० विश्वचषक २०२६)
भारतीय टी-२० विश्वचषकात सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग हे खेळाडू आहेत.
पाकिस्तान संघ (टी-२० विश्वचषक २०२६)
सलमान अली आगा (कर्णधार), अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान, उस्मान तारिक. या सामन्यात दोन्ही संघांची ताकद, खेळाडूंचा परफॉर्मन्स आणि कोलंबोतील हवामान यामुळे आणखी रोमांचक ठरणार आहे.