भारतीय संघ 4 दिवस इंग्लंडमध्येच अडकून, भारतात येण्यासाठी तिकीटच मिळेना

सेमीफायलनध्ये बुधवारी भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला. त्या पराभवानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतण्यासाठी निघाले, मात्र त्यांचं तिकीटच बूक न झाल्याने, आता त्यांना जबरदस्तीने वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत इंग्लंडमध्ये राहावं लागणार आहे.

भारतीय संघ 4 दिवस इंग्लंडमध्येच अडकून, भारतात येण्यासाठी तिकीटच मिळेना
| Updated on: Jul 12, 2019 | 4:50 PM

लंडन : विश्वचषकातील प्रवास संपलेल्या टीम इंडियाचा परतीचा प्रवास सुरु झाला आहे. मात्र भारतीय संघासमोर वेगळाच प्रश्न निर्माण झाला आहे. सेमीफायलनध्ये बुधवारी भारताचा न्यूझीलंडने 18 धावांनी पराभव केला. त्या पराभवानंतर भारतीय खेळाडू मायदेशी परतण्यासाठी निघाले, मात्र त्यांचं तिकीटच बूक न झाल्याने, आता त्यांना जबरदस्तीने वर्ल्डकपच्या फायनलपर्यंत इंग्लंडमध्ये राहावं लागणार आहे.

याप्रकारामुळे टीम इंडियाची वाहतूक व्यवस्था पाहणारे व्यवस्थापकाची डोकेदुखी वाढली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, BCCI भारतीय खेळाडूंच्या रिटर्न तिकिटांची व्यवस्था अद्याप करु शकली नाही. त्यामुळे रविवारपर्यंत भारतीय संघाला मँचेस्टरमध्येच राहावं लागणार आहे.

सेमीफायनलमधील पराभवानंतर बीसीसीआयने खेळाडूंचे रिटर्न तिकीट बुक करण्याचा ऐनवेळी प्रयत्न केला, मात्र तिकीटं मिळाली नाहीत. त्यामुळे आता लॉर्ड्सच्या मैदानावर 14 जुलैला न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड यांच्यातील फायनल सामन्यानंतरच भारतीय संघ मायदेशी परतेल.

भारतीय संघाने गुरुवारी हॉटेल सोडलं होतं.  मात्र आता फायनलपर्यंत त्यांना इथेच राहावं लागणार आहे. काही खेळाडू इंग्लंडवरुन थेट भारतात येतील, तर काहीजण फिरण्यासाठी विविध ठिकाणी जाणार आहेत.

भारतीय संघाला 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जायचं आहे. या दौऱ्यात 3 टी 20 सामने खेळवण्यात येणार आहेत. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये दोन सामने होतील. त्यानंतर 8 ते 14 ऑगस्टदरम्यान वन डे मालिका होईल. यानंतर मग दोन सामन्यांची कसोटी मालिका होईल.