
टीम इंडियाने काल सहाव्यांदा अंडर 19 क्रिकेट वर्ल्ड कप जिंकला. क्रिकेट विश्वात अशी कामगिरी आतापर्यंत कुठल्याही संघाला जमलेली नाही. टीम इंडियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप विजयाचं स्वप्न साकार करता आलं ते वैभव सूर्यवंशीमुळे. इंग्लंड विरुद्धच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये वैभव सूर्यवंशीने टीमला जी स्टार्ट दिली, त्यामुळे विश्वविजयाचं स्वप्न साकार करता आलं. वैभव सूर्यवंशीने अत्यंत स्फोटक फलंदाजी केली. तो इंग्रजांवर तुटून पडला. 80 चेंडूत त्याने 175 धावा फटकावल्या. यात 15 फोर, 15 सिक्स होते. वैभवच्या अफाट खेळीमुळे वर्ल्ड कप फायनलमध्ये भारतीय संघाने इंग्लंडसमोर विजयासाठी 412 धावांचं डोंगराएवढ लक्ष्य ठेवलं. इंग्लंडला हे आव्हान पेलवलं नाही. इंग्लंडचा डाव 40.2 ओव्हर्समध्ये 311 धावांवर आटोपला.
वैभव सूर्यवंशीने मागच्यावर्षी आयपीएलमध्ये शतक ठोकून सर्वांच लक्ष वेधून घेतलं होतं. तो 14 वर्षांचा आहे. तेव्हापासून त्याच्या खेळाची चर्चा आहे. इतक्या लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर वैभव सूर्यवंशी ज्या दर्जाचं क्रिकेट खेळतोय, त्याने अनेकांना प्रभावित केलय. अनेकजण आतापासूनच त्याची तुलना सचिन तेंडुलकरशी करु लागले आहेत. कारण सचिनने सुद्धा किशोर वयातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.
पारंपारिक प्रतिमेला छेद दिलाय
वैभव सूर्यवंशीची सचिन तेंडुलकर बरोबर तुलना होतेय. त्यावर राष्ट्रीय ज्यूनियर निवड समितीचे माजी अध्यक्ष व्हीएस थिलक नायडू बोलले आहेत. “वैभव सूर्यवंशीने पारंपारिक प्रतिमेला छेद दिलाय. त्यामुळे सचिन तेंडुलकर सोबत तुलना होणं स्वाभाविक आहे. वैभव आता जे खेळतोय, तशीच तेंडुलकरने किशोरवयामध्ये लाट निर्माण केली होती. सचिन क्रिकेटमधील वय या फॅक्टरला अपवाद ठरला. फार कमी वेळात त्याने भारतीय क्रिकेटमध्ये स्वत:ची ओळख निर्माण केली” असं नायडू म्हणाले.
बोलण्यात कुठे वैभव सूर्यवंशीचा अनादर करण्याचा भाव नव्हता
“त्याचप्रमाणे वैभवचा उत्साह लक्षात घेता त्याच्या खेळाच्या प्रगतीबाबत जास्त काळजी घेतली गेली आहे. मात्र असं असलं तरीही तो तेंडुलकर नाही. तो तसा कदाचित कधी बनू शकणार नाही” असं व्हीएस थिलक नायडू म्हणाले. नायडू यांच्या बोलण्यात कुठे वैभव सूर्यवंशीचा अनादर करण्याचा भाव नव्हता. “वैभव सूर्यवंशीला पुढचा तेंडुलकर बनण्याची गरज नाही. त्याने वैभव सूर्यवंशीच रहावं. तेच पुरेसं आहे” असं नायडू यांना वाटतं.