मुंबई : बँकांप्रमाणेच अकाऊंटमधील कमी बॅलेंससाठी आता टेलीकॉम कंपन्याही वापरकर्त्यांना मेसेज पाठवत आहेत. या मेसेजमध्ये तुम्हाला तुमच्या सिम कार्डमध्ये रिचार्ज करायला सांगितले जाईल, नाही तर तुमचा नंबर बंद होईल. प्रीपेड वापरकर्त्यांना सिमकार्डमध्ये 35 रुपयांचा रिचार्ज करा, असे टेक्स्ट मेसेज कंपनीकडून पाठवण्यात येत आहेत. पण कुठल्या सिममध्ये कितीचा रिचार्ज करायचा हे त्या कंपनीवर अवलंबून आहे. रिचार्ज न केल्यास तुमचं सिम बंद केलं जाऊ शकतं.
पोस्टपेड वापरकर्त्यांवर हे नियम लागू होणार नाहीत. कारण ते महिन्याच्या अखेरीस त्यांच्या प्लॅननुसार पैसे भरतात.
सध्या सर्वच कंपन्यांनी आपले अनलिमिटेड प्लॅन्स लाँच केले आहेत. या प्लॅन्सची व्हॅलिडिटी एक महिना ते तीन महिन्यापर्यंत आहे. रिपोर्टनुसार एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीकडून ग्राहकांना वॉर्निंग मेसेज पाठवण्यात येत आहेत. ‘सुचना, तुमचा व्होडाफोन मोबाईल नंबर XXXXXXXXXX बंद केला जाऊ शकतो. असुविधा टाळण्यासाठी अनलिमिटेड ऑल राउंडर रिचार्ज कारावा’, असा मेसेज व्होडाफोन कंपनीकडून पाठवण्यात येत आहे.
हा मेसेज व्होडाफोनच्या त्या वापरकर्त्यांना पाठवला जात आहे, ज्यांच्या अकाऊंटमध्ये मिनीमम बॅलेंस आहे. तुमच्या व्होडाफोन सिमला सुरु ठेवण्यासाठी तुमच्या सिममध्ये कमीतकमी 65 रुपयांचा बॅलेंस असणं आवश्यक आहे.
काही दिवस तुम्हाला असे मेसेज पाठवण्यात येतील, जर त्यानंतरही तुम्ही रिचार्ज केला नाही तर तुमची आऊटगेइंग सेवा आणि मोबाईल डेटा बंद करण्यात येईल. त्यानंतरही जर तुम्ही रिचार्ज केला नाही तर तुमची इनकमिंग सेवा बंद केली जाईल. त्यानंतर तुम्ही कधी पर्यंत रिचार्ज करु शकता याचा एक मेसेज तुम्हाला पाठवण्यात येईल. तुम्हाला रिचार्ज करुन सिम पुन्हा अॅक्टिव्हेट करावे लागेल. नाहीतर तुमच्या सिमवरील सर्व सेवा बंद करण्यात येतील.
त्यामुळे जर तुमच्या एअरटेल आणि व्होडाफोन कंपनीच्या सिमवरील सेवा बंद झाल्या असतील तर लगेच रिचार्ज करा.