Inflation : भाजीपाल्याच्या भावाची पेट्रोल, डिझेलसोबत स्पर्धा, टोमॅटोने आणले ग्राहकांच्या डोळ्यात पाणी; इतर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ

| Updated on: May 29, 2022 | 6:56 AM

भाजीपाल्याचे दर गगनाला भिडले आहेत. टोमॅटोसोबतच लसून, ढोबळी मिरची , गवार, वाटाण्याच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. भाजीपाल्याचे दर वाढल्यााने गृहिणीचे बजेट बिघडले आहे.

Inflation : भाजीपाल्याच्या भावाची पेट्रोल, डिझेलसोबत स्पर्धा, टोमॅटोने आणले ग्राहकांच्या डोळ्यात पाणी; इतर भाज्यांच्या दरातही मोठी वाढ
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राज्यात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. महागाई गगनाला भिडली आहे. पेट्रोल, डिझेलपासून (Petrol, diesel rates) ते खाद्यतेलापर्यंत आणि अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत (vegetables Rate) सर्वच गोष्टींच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. भाजीपाला आणि एलपीजी गॅस दरात झालेल्या वाढीमुळे गृहिणींचे किचन बजेट बिघडले आहे. टोमॅटोने ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणले असून, टोमॅटोच्या भावाने शंभरी पार केली आहे. आता हळूहळू रोजच्या जेवणातून आणि हॉटेलमधून देखील टोमॅटो गायब होताना दिसत आहे. केवळ टोमॅटोच नाही तर इतर भाज्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. नवीन टोमॅटो आणखी बाजारात आला नसल्याने सध्या टोमॅटोचा तुटवडा आहे, त्यामुळे भावात वाढ झाल्याचे बोलले जात आहे. गेल्या महिन्यापासून टोमॅटोची आवक घटली आहे. त्यामुळे टोमॅटोच्या दरात वाढ होत आहे. 15 दिवसांपूर्वी टोमॅटोचे दर 40 रुपये किलो होते. त्यानंतर 60 रुपये प्रति किलो झाले, त्यानंतर 80 रुपयांवर पोहोचले आणि सध्या बाजारात टोमॅटो प्रति किलो 100 रुपये विकले जात आहेत.

इतरही भाजीपालाही महागला

केवळ टोमॅटोच महागले असे नाही तर इतरही भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ पहायला मिळत आहे. भेंडी प्रति किलो 80 रुपये, लसूण प्रति किलो 120 रुपये, ढोबळी मिरची प्रति किलो 100 रुपये, चवळी 80 रुपये आणि वाटाणा 120 रुपयांवर पोहोचला आहे. भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाल्याने गृहिणींना किचनचं बजेट सांभाळताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता नसल्याने भाज्यांची आवक कमी होते, भाज्यांची आवक कमी झाल्याने दरात वाढ होत असते. मात्र यंदाच्या उन्हाळ्यात भाजीपाल्यांच्या दरात सरासरीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. काही भाज्यांनी तर दराच्या बाबतीत पेट्रोल, डिझेलाही मागे टाकले आहे. वाढत्या भाज्यांच्या दरांमुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. दुसरीकडे अन्नधान्याचे भाव देखील वाढत असून, गव्हाचे पीठ प्रति किलो पन्नास रुपयांवर पोहोचले आहे.

हे सुद्धा वाचा

पुण्यात दळणाच्या दरात वाढ

महागाईत आणखी भर म्हणजे आता पुण्यात दळण देखील महागले आहे. पूर्वी दळणासाठी सात रुपये प्रति किलो दराने पैसे मोजावे लागत होते. मात्र आता त्यामध्ये एक रुपयांची वाढ करण्यात आली आहे. आता दळणाचे भाव प्रति किलो आठ रुपयांवर पोहोचले आहेत. पुणे शहर जिल्हा पीठगिरणी मालक संघाच्या बैठकीत दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. आता यानंतर इतर शहरात देखील दळणाचे भाव वाढू शकतात. महागाई गेल्या नऊ वर्षातील सर्वोच्च स्थराला पोहोचल्याने महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे.