Vaidyanath Sugar Factory Sale : गोपीनाथ मुंडेंनी उभा केलेल्या कारखान्याची पंकजाताईंकडून विक्री? गंभीर आरोपानं बीडमध्ये खळबळ
दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीवरून वाद निर्माण झाला आहे. पंकजा मुंडेंसह संचालकांनी शेतकऱ्यांना अंधारात ठेवून खासगी कंपनीला कवडीमोल दराने कारखाना विकल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. यामुळे आर्थिक आणि भावनिक अशा दोन्ही पातळ्यांवर बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्थापन केलेल्या वैद्यनाथ साखर कारखान्याच्या विक्रीवरून सध्या बीड जिल्ह्यात मोठा वाद निर्माण झाला आहे. हा कारखाना खासगी कंपनीला विकण्यात आल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे. कारखान्याच्या अध्यक्षा पंकजा मुंडे आणि इतर संचालकांवर शेतकऱ्यांना अंधारात ठेवून ही विक्री केल्याचा गंभीर आरोप आहे.
शेतकरी संघटनेनुसार, वैद्यनाथ साखर कारखाना एका खासगी कंपनीला १३२ कोटी रुपयांच्या कवडीमोल दराने विकण्यात आला आहे. या व्यवहाराचे दस्तऐवज समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कारखान्यावर विविध बँकांचा बोजा, तसेच ७००० सभासद, ऊस वाहतूकदार, कामगार आणि शेतकऱ्यांची देणी बाकी असतानाच ही विक्री झाल्याचे म्हटले जात आहे. ही विक्री बेकायदेशीर असल्याचा आरोप शेतकरी संघटनेने केला आहे.
कारखान्याच्या जमिनीमध्येच गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक गोपीनाथ गड असल्याने हा केवळ आर्थिकच नव्हे, तर भावनिक मुद्दाही बनला आहे. शेतकरी संघटनेने याविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा आणि बेमुदत आंदोलन सुरू करण्याचा इशारा दिला आहे.
Published on: Oct 14, 2025 11:22 AM
नेपाळमध्ये अडकलेल्या ११५ महाराष्ट्रीयांना मुख्यमंत्र्यांकडून मदत
मुंबई महापालिकेकडून शालेय साहित्य वाटपास विलंब: इराण युद्ध कारणीभूत
शिल्पा गवारे कुटुंबीयांकडून छळाचा आरोप, न्यायची मागणी
नेपाळमध्ये अडकलेल्या नागपूरच्या 106 पर्यटकांची सुखरूप सुटका
