Onion Price News : कांद्याचे दर कोसळले, कवडीमोल भावाने शेतकरी संतापले
बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात थांबवल्याने देशांतर्गत कांद्याचे भाव कोसळले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाले असून, प्रति क्विंटल किमान दोन हजार रुपये भाव किंवा अनुदान देण्याची मागणी करत आहेत. सरकारने तातडीने लक्ष न दिल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
बांगलादेशने भारतीय कांद्याची आयात थांबवल्याने भारतात कांद्याचे दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत, ज्यामुळे शेतकरी संतापले आहेत. उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी शेतकरी आक्रमक झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, येवला बाजार समितीत ७०० वाहनांमधून आलेल्या लाल कांद्याला सरासरी ६०० ते ८०० रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला. कमाल १२५१ रुपये, तर किमान २५१ रुपये प्रति क्विंटल असा दर शेतकऱ्यांच्या पदरी पडला. हा भाव उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याने शेतकरी हवालदिल आहेत.
शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे की, सरकारने कांद्याला प्रति क्विंटल किमान दोन हजार रुपये भाव द्यावा किंवा प्रति क्विंटल एक हजार रुपये अनुदान जाहीर करावे. बांगलादेश हा एकेकाळी भारतीय कांद्याचा सर्वात मोठा आयातदार होता, परंतु आता दोन्ही देशांमधील संबंध पूर्वीसारखे राहिलेले नाहीत आणि बांगलादेशातही कांद्याचे मोठे उत्पादन झाल्याने त्यांनी नवीन आयात परवानग्या नाकारल्या आहेत. शासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

