Raj Thackeray : मुख्यमंत्री होताच राज ठाकरेंचा फडणवीसांना इशारा, ‘…असं जाणवलं तर चुकांची जाणीव करून देणार हे नक्की’
राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, महायुती सरकारचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे.
आज महायुती सरकारचा आझाद मैदानात भव्य शपथविधी पार पडला. यावेळी राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. दरम्यान, महायुती सरकारचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले आहे. राज ठाकरे म्हणाले, ‘आज माझे स्नेही आणि भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्रातील नेते श्री. देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, याबद्दल त्यांचं अभिनंदन. २०१९ ला खरंतर ही संधी त्यांना मिळायला हवी होती, पण तेंव्हा आणि पुढे २०२२ मध्ये जे घडलं त्यामुळे ती संधी हुकली. असो, पण यावेळेस महाराष्ट्रातील जनतेने महायुतीला म्हणण्यापेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला जे प्रचंड अविश्वसनीय बहुमत दिलं आहे, त्याचा या राज्यासाठी, इथल्या मराठी माणसांसाठी आणि मराठी भाषा आणि संस्कृतीसाठी तुम्ही योग्य वापर कराल अशी मी आशा करतो’, असे राज ठाकरे म्हणाले. तर पुढची ५ वर्ष सरकारच्या कुठल्याही चांगल्या उपक्रमांना माझा, माझ्या पक्षाचा पाठींबा असेल. पण सरकार चुकतंय, लोकांना गृहीत धरतंय असं जर जाणवलं, तर मात्र विधिमंडळात जरी सध्या शक्य नसलं तरी, विधिमंडळाच्या बाहेर मात्र आम्ही सरकारला त्यांच्या चुकांची जाणीव करून देऊ हे नक्की.. असे म्हणत राज ठाकरे यांनी शुभेच्छा देत थेट इशारा दिला आहे.