Unseasonal Rain : द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, या कारणामुळे बसला 12 कोटींचा फटका

मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पाऊसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर रबी हंगामातील अनेक पीक उद्धवस्त झाली आहेत.

Unseasonal Rain : द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात, या कारणामुळे बसला 12 कोटींचा फटका
द्राक्षे
| Updated on: Mar 18, 2023 | 12:34 PM

उमेश पारीक, नाशिक : ‘दुष्काळात तेरावा महिना’ही म्हण अगदी तंतोतंत लागू होईल अशी काहीशी घटना, सध्या द्राक्ष (Grapes)उत्पादकांच्या बाबतीत घडताना दिसत आहे. द्राक्षाची पांढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक (nashik) जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झालेला असताना बांगलादेशाने आयात शुल्क अद्यापही रद्द न केल्याने द्राक्षाचे बाजार भाव घसरला आहे. तर अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rain) द्राक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा यासह अनेक संकटांचा सामना करण्यासाठी…

द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा करत थंडीवर मात करत द्राक्षांचे पिक जोमदार घेतले. आता द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला असून एकट्या नाशिक जिल्ह्यामधून 38 हजार 20 टन द्राक्ष निर्यात झाली आहे. तर संपूर्ण राज्यातून 3 हजार 99 कंटेनरमधून 41 हजार 109 टन द्राक्षांची निर्यात बांगलादेशासह युरोप खंडात झाली आहे. पण या निर्यातीतून एकट्या बांगलादेशात सर्वाधिक निर्यात झाली. बांगलादेशाने आयात कर लावले असल्यामुळे व्यापारीवर्ग किलोला 15 ते 20 रुपये दर देत असल्याने द्राक्ष उत्पादकांना यापाठीमागे 12 कोटींचा फटका बसला आहे. तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव, द्राक्ष मणी तडकल्याचे चित्र आता सर्वत्र पाहवयास मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा यासह अनेक संकटांचा सामना करण्यासाठी कांद्याप्रमाणे आता द्राक्षांना ही अनुदानाची मागणी जोर धरू लागली आहे.

अवकाळी पाऊसाने जोरदार बॅटिंग केली

मागच्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अवकाळी पाऊसाने जोरदार बॅटिंग केली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या बागा उद्धवस्त झाल्या आहेत. त्याचबरोबर रबी हंगामातील अनेक पीक उद्धवस्त झाली आहेत. त्यामुळं शेतकऱ्यांना मदत व्हावी अशी अपेक्षा सचिन होळकर, (द्राक्ष उत्पादक शेतकरी) यांनी दिली.