Marathwada : पावसाचा जोर कमी, नुकसानीच्या खुणा मात्र कायम, शेतकऱ्यांचे आता सरकारलाच साकडे..!

| Updated on: Jul 16, 2022 | 4:19 PM

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे केवळ खरिपातील तूर,मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाचेच नुकसान झाले असे नाही तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. लागवड होताच पाणी साचून राहिल्याने हळद पीक सडले आहे. तीच अवस्था ऊसाचीही झाली त्यामुळे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचेच उत्पादन घटणार असे नाहीतर ऊस आणि हळदीवरही त्याचा परिणाम होणार आहे.

Marathwada : पावसाचा जोर कमी, नुकसानीच्या खुणा मात्र कायम, शेतकऱ्यांचे आता सरकारलाच साकडे..!
मराठवाड्यात पावसाचा जोर कमी झाला असला तरी पिकांमध्ये पाणी साठलेले आहे.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नांदेड :  (Marathwada) मराठवाडा विभागात 1 जुलैपासून सुरु असलेल्या पावसाने गेल्या दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी त्याने (Crop Damage) नुकसानीच्या खुणा कायम ठेवल्या आहेत. नांदेडसह हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये केवळ पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर शेतजमिनही खरडून गेली आहे. (Kharif Season) खरीप हंगामातील पिकांबरोबर ऊस, हळद आशा बारमाही असणाऱ्या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. शेतीला तळ्याचे स्वरुप आल्याने पिके जागेवर सडली आहेत. विशेष म्हणजे दुबार पेरणी केल्यानंतर पावसाने हा कहर केला आहे. त्यामुळे आता तिसऱ्यांदा पेरणी करण्याची शेतकऱ्यांची परस्थिती नाही. त्यामुळे सरकारनेच आर्थिक मदत करावी अशी मागणी होत आहे.

ऊस, हळद मुख्य पिकांनाही फटका

गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे केवळ खरिपातील तूर,मूग, उडीद, सोयाबीन आणि कापसाचेच नुकसान झाले असे नाही तर नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये हळदीचे उत्पादन क्षेत्रही मोठ्या प्रमाणात आहे. लागवड होताच पाणी साचून राहिल्याने हळद पीक सडले आहे. तीच अवस्था ऊसाचीही झाली त्यामुळे अधिकच्या पावसामुळे खरिपातील पिकांचेच उत्पादन घटणार असे नाहीतर ऊस आणि हळदीवरही त्याचा परिणाम होणार आहे. अतिवृष्टीनंतर जमिनीत अजून मोठ्या प्रमाणात ओलावा टिकून असल्याने दुबार पेरणी देखील शक्य नाही.

अर्धापुरी केळीला फटका

नांदेडमध्ये सलग झालेल्या चार दिवसाच्या अतिवृष्टीमुळे प्रसिद्ध असलेल्या अर्धापुरच्या केळी फळबागांना ही मोठा फटका बसलाय. केळीच्या बागात पाणी साचून राहिल्याने बुरशीजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढलाय. याचे वेळीच व्यवस्थापन केले नाही तर केळी च्या बागांवर पुन्हा करपा रोग पसरू शकतो असे कृषीतज्ञांचे मत आहे. त्यामुळे केळीच्या बागा टिकवण्यासाठी शेतकऱ्यांचा खर्च वाढला आहे.

हे सुद्धा वाचा

भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम

अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे केवळ पिकांचेच नुकसानच नाहीतर भाजीपाल्याच्या दरावरही परिणाम झाला आहे. उत्पादनात घट आणि वाहतूकीला अडथळा होत असल्याने मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने भाजीपाल्याचे दर हे वाढत आहेत. दरवर्षी पावसाळ्यात अशीच स्थिती असते पण यंदा अधिकचा परिणाम हा दरावर झालेला आहे. शिवाय खरिपात लागवड केला जाणाऱ्या भाजीपाल्याची लागवडही पावसामुळे लांबणीवर पडली आहे. त्यामुळे भविष्यात भाजीपाल्याचे दर हे चढेच राहतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे.