जंतरमंतरवर सर्वात व्हायरल झालेला इरफान छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काय बोलला? टीव्ही9 मराठीला Exclusive Interview
जंतरमंतरवरील आंदोलनामुळे व्हायरल झालेल्या इरफान मोहम्मदने टीव्ही9 मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत आपले विचार स्पष्टपणे मांडले. कोणताही शिक्षणाचा गंध नसतानाही देशाची बाजू मांडणारा हा तरुण संविधान आणि व्यवस्थेवर बोलतो. विशेष म्हणजे, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा त्याचा आदर आणि 'जय शिवाजी'ची घोषणा प्रत्येकाच्या मनाला भिडते.

प्रमोद जगताप, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, नवी दिल्ली : जंतरमंतरवर व्हायरल झालेला इरफान मोहम्मद संपूर्ण देशात प्रसिद्ध झाला आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या मुलांसाठी इरफान मोहम्मद धावून आला. त्यांच्यासाठी पोटतिडकीने बोलू लागला. जनआंदोलनातून आलेला इरफान सरकारवर तुटून पडला होता. त्याची पोटतिडकी व्हायरल झाली. त्याने मांडलेल्या वेदना घराघरापर्यंत पोहोचल्या आणि देशाने त्याला डोक्यावर घेतलं. इतकंच नाही तर काँग्रेस नेते राहुल गांधींनी त्याच्या झोपडीत जाऊन त्याची भेट घेतली. प्रियंका गांधींनी त्याच्याशी फोनवरून संवाद साधला. इरफानने टीव्ही9 मराठीलाही एक्सक्लुसिव्ह मुलाखत दिली. यावेळी तो संविधान, देशाची व्यवस्था यावर बोललाच. पण छत्रपती शिवाजी महाराजांवरही तो भरभरून बोलला.
दिल्लीतील जंतर मंतर इथ झालेल्या कॉक्रोच जनता त्यांच्या पार्टीच्या आंदोलनादरम्यान अनेक चेहरे प्रकाशझोतात आले. याच काळात एक चेहरा व्हायरल झाला त्याच नाव मोहम्मद इरफान. संसदेपासून 50 किलोमीटर अंतरावर असलेल्या बहादुरगढ परिसरात एका झोपडपट्टीत इरफान राहायला आहे. इरफान एक फेरीवाला असून वडिलांचं बर्फ विकण्याच दुकान चालवत आहे. घरावर पत्रा नाही. साधी ताडपत्री टाकलीय अशा ठिकाणी इरफान राहतो. अजिबात शिक्षण झालेलं नाही, पण बोलण्यावर मात्र पकड, विचारांची स्पष्टता आणि देशाची बाजू प्रत्येक शब्दात इरफानकडून मांडली जाते.
गांधी सत्तेत येणार, पण मोदींना भेटेन
इथे इंडिया आणि भारत आहे. मी भारताची बाजू मांडतो. कारण मी तो भारत जगलोय, बघत आहे हे स्पष्टपणे इरफान सांगत असतो. 20 तारखेचा पोलिसांचा लाठीचार्ज, भारताबद्दल असलेली संकल्पना, देशाचं राजकारण आणि राजकीय नेत्यांबद्दल असलेली मतं, पुढचं भविष्य आणि शिक्षणाचं महत्त्व या सगळ्यांबद्दल इरफान पोटतोडकिने बोलतो. इरफानच्या नजरेतून त्यान पाहिलेलं आंदोलन, राहुल गांधी सत्तेत येणार हे ठामपणे बोलत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी मिळाली तर मी नक्की भेटेल असं म्हणत असताना मतभेद वैचारिक आहेत आणि ते का? हेही तो ठामपणे सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बोलताना इरफानचा आदर दिसतो.
नेता तर निवडावा लागेल
पूर्वी मी तिथेच राहायचो. मी कधी कधी रात्री घरी येऊन झोपायचो. मी फक्त जंतरमंतरवरच नाही, तर देशात जिथेही आंदोलन होईल तिथे जातो. राहुल गांधींकडून अपेक्षा आहे. आपल्याला नेता निवडावा लागेल. जेव्हा राहुल गांधी निर्धन मजूर व्यक्तीच्या घरी रात्री जातात, याचा अर्थ ते जीवन जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. गरीबांच्या वेदना समजून घेतात असं इरफान म्हणतोय.
मलाही खूप मारलं
मी 20 तारखेला तिथे होतो. मला खूप मारलं. माझ्या पायाचं नख तुटलं. पोलिसांनी जोरदार मारहाण केली. त्यांनी पाण्याचा फव्हारा मारायला हवा होता. त्यांनी लाठ्याकाठ्या चालवायला नको होत्या, असंही तो म्हणाला.
जय शिवाजी…
इरफानच्या भूमिका स्पष्ट आहेत. तो छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानतो. जेव्हा मुलाखत संपली तेव्हा त्याने अनपेक्षितपणे जय शिवाजी, जय महाराष्ट्र आणि जय बिहार अशी हात उंचावून घोषणा दिली. यावरून महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलची त्याची आस्था दिसून येते. इरफानची जय शिवाजी, जय महाराष्ट्र ही घोषणा ऐकून प्रत्येक मराठी माणसाचा उर भरून आल्याशिवाय राहणार नाही.
