मुंबईतल्या रियापेक्षाही व्हायरल झालेला जंतरमंतरवरचा मोहम्मद इरफान कोण? व्हिडिओ व्हायरल होताच…
जंतरमंतरवरच्या मोहम्मद इरफानचा व्हायरल व्हिडिओ लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मूल्यांवर प्रकाश टाकतो. NEET आंदोलनात विद्यार्थ्यांवर झालेल्या दमनशाहीने व्यथित होऊन, इरफानने सरकारवर कडाडून टीका केली. संवादाऐवजी दंडुक्याचा वापर लोकशाहीला मारक असल्याचे त्याचे मत आहे.

सर, मी माझ्या झोपडीत सकाळी उठलो… फोन उघडला… सरकार हुकूमशाहीवर उतरल्याचं समजलं… अमानूषपणे पोरांना मारलं सर या सरकारने. ही लोकशाही नाहीये. ही हुकूमशाही आहे. लोकशाहीत संवादाची आवश्यकता असते. दोन्हीकडून संवाद झाला पाहिजे. पण सरकारने मुलांना बेदम मारलं. एखादं सरकार असतं तर नारळपाणी घेऊन गेली असती, पण या सरकारने दंडुक्याने काम चालवलं… सर ही लोकशाही नाही… नाही… नाही… निश्चितच लोकशाही नाही… मोहम्मद इरफानचे हे शब्द तुमच्या अंतरआत्म्याला झटका दिल्याशिवाय राहणार नाही. दिल्लीच्या झोपडपट्टीत राहणारा मोहम्मद, जंतरमंतरवरच्या हल्ल्याने व्यथित झालाय. मनाने जखमी झालाय. त्यामुळे तो आग ओकत होता. व्यवस्थेला सवाल करत होता. पोटतिडकीने मनातील भावना व्यक्त करत होता. बोलता बोलता त्याचे हात थरथरत होते. त्याचे शरीर कंपन पावत होते. त्याचे शब्द घणाचे घाव बनून टाळक्यात पडत होते. मोहम्मदचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. तुम्हीही हे व्हिडीओ पाहाल तर तुमच्या डोळ्यावरची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही. डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत. अन् याच लोकांमुळे लोकशाही जिवंत आहे, याचा सार्थ अभिमान वाटल्याशिवायही राहणार नाही.
जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन झालं. कोवळी पोरं रस्त्यावर उतरली. या मुलांना दुनियादारी माहीत नाही. पण नीट परीक्षेचे पेपर फुटल्याने आपल्याच वयाच्या 21 मुलांनी आयुष्य संपवलं याचा संताप या मुलांना आला. एवढी मुलं गेल्यानंतरही सरकारकडून काहीच होत नसल्याने या मुलांचा तीव्र आक्रोश फुटला आणि त्यांनी रस्त्यावर येऊन या आक्रोशाला वाट मोकळी करून दिली. जंतरमंतवर विद्यार्थ्यांनी गेल्या सोमवारी मोठा एल्गार पुकारला. तेव्हा पोलिसांनी ढोरांना मारावं तसं मुलांना मारलं. यात असंख्य मुलं जखमी झाले. मुली जखमी झाल्या. त्यांची डोकी फोडली. पण पोरं हटली नाहीत. मागे फिरली नाहीत. मुलांना बेदम मारहाण केल्याची वार्ता जगभर पसरली अन् तीव्र संताप उसळला.
त्याचा आक्रोश फुटला
या हल्ल्यानंतर प्रत्येक वर्गातील लोक जंतरमंतरच्या दिशेने आले. पोरांना खंबीर पाठिंबा देण्यासाठी काहींनी आपआपल्या शहरातच आंदोलन केलं. मोहम्मद इरफान हा दिल्लीच्या झोपडपट्टीतच राहत होता. त्यालाही राहवलं नाही. तोही या आंदोलनात साथ देण्यासाठीच नव्हे तर मार खाण्यासाठी आला. मुलांच्या हिश्याचा मार मीही खाईन असं म्हणून तो आला. त्याने जंतरमंतवरचं चित्र पाहिलं अन् हादरून गेला. त्यानंतर त्याच्या आक्रोशाचा बांध फुटला. व्यवस्थे विरोधात तो जोरजोरात बोलत होता. घणाचे घाव बसावेत असे त्याचे शब्द येत होते. ‘लल्लन टॉप’ने मोहम्मदला हेरलं. त्याचा आक्रोश कॅमेऱ्याच्या लेन्समध्ये बंद केला. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. मुंबईतल्या पोलिसांना भिडणाऱ्या रियापेक्षाही मोहम्मद जगभर व्हायरल झालाय.
मोहम्मद इरफान काय म्हणाला…
सकाळी जेव्हा मी उठलो ना माझ्या झोपडीत सर, फोन उघडला… सरकार पूर्णपणे हुकूमशाहीवर उतरली होती. मला वाटतं लोकशाहीत अहंकार नव्हे, संवाद असला पाहिजे. आणि संवादाचे दरवाजे दोन्हीकडून उघडे असले पाहिजे. जर हेच सरकार एखादं नारळपाणी घेऊन आली असती… यूपीएने अण्णाजींना नारळपाणी दिलं होतं. इंदिरा गांधींनी वांगचुक यांच्या वडिलांना नारळपाणी पाजलं. महात्मा गांधींना इंग्रजांनी नारळपाणी पाजलं सर. हे सरकारही संवादाचा मार्ग स्वीकारू शकली असती सर. संविधानाने व्यक्तीच्या प्रतिष्ठेला सुनिश्चित केलंय. व्यक्तीची प्रतिष्ठा कमी होता कामा नये सर. या देशाच्या लाचार शिक्षण व्यवस्थेबद्दल उपोषण सुरू होतं. काय मागत होते सर ही मुलं? दिल्लीत फ्लॅट द्या, राज्यसभेचं तिकीट द्या किंवा मोदी सरकारमध्ये मंत्रिपद द्या असं काही मागत नव्हते. या लाचार शिक्षण व्यवस्थेला दुरुस्त करा, जबाबदारी ठरवा आणि राजीनामा द्या, एवढंच मागत होते. मोठी मागणी नव्हती. ज्या पद्धतीने नवीन पोलीस आयुक्त अनुराग कुमार आले, त्यांनी पोलिसी दंडुका आणि बुटाने एक सुंदर लोकशाही तुडवण्याचा प्रयत्न केला. ते तर अभिनंदनास पात्र आहेत. आज त्यांच्या दरबारात मोगॅम्बो खूश होईल. समजताय ना सर?
जेव्हा माणूस हताश आणि निराश होतो ना, तेव्हा… कवी नीरजची एक लाईन आठवते सर…
स्वप्न झरे फूल से, मीत चुभे शूल से
लुट गये सिंगार सभी बाग़ के बबूल से
और हम खड़े-खड़े बहार देखते रहे।
कारवाँ गुज़र गया गुबार देखते रहे।
नींद भी खुली न थी कि हाय धूप ढल गई
पाँव जब तलक उठे कि ज़िन्दगी फिसल गई
पात-पात झर गए कि शाख़-शाख़ जल गई
चाह तो निकल सकी न पर उमर निकल गई…
समजून घ्या सर या विचारांना, ही तडप, काय विचार करत आहे देश? नीरज असंच लिहित नाहीये. नीरजला काही स्वप्न पडलेलं नाही. नीरज विचार करत आहेत की, किती काळ आला गेला, चांगले वाईट लोक माझ्या सोबत होते. आज माझ्या वाट्याला धूळ आलीय, नीरज यांना हेच सांगायचंय. आमच्या म्हणण्याचं अर्थ आहे की, लोकशाहीत असहमती असणं काही गुन्हा नाहीये. भारतीय संविधानाने आपल्याला अभिव्यक्तीचा मौलिक अधिकार दिला आहे. लोकशाही संकुचित होत आहे. मी जंतरमंतरवर असा धावत आलोय, एकाने म्हटलं, मला मारलं तो रडू लागला. मी म्हटलं यार मलाही मारलं पाहिजे. माझ्या शरीराच्या मांसपेशीशी माझी आत्मा लढायला लागली. काय करतोस झोपडीत बसूनय़ चल यार, पोलिसांचा मार खाऊ, असं माझं मन म्हणालं. नवीन नवीन पोलीस कमिश्नर आले आहेत. जोशात आहेत. मोठी व्यवस्था, ताकद, धन आणि बल त्यांच्याकडे आहे. चला मार खाऊ. ही लोकशाही नाहीये. हा लोकशाहीचा मार्ग नाहीये. लोकशाहीत संवाद झाला पाहिजे. मग तुमच्याशी सहमत असो नसो, पण संवाद झाला पाहिजे. या बोलू. काही गैरसमज असेल तर दूर करू. यात काही चूक नाहीये.
कुणाला अपमानित करणं योग्य नाही. आले… मीडियात बातमी चालवली. वांगचुक यांना उचलून नेण्यात आलं. दहशतवादी होते? बदमाश होते? गुंड होते? या देशाचा महान शिक्षण तज्ज्ञ होता. पर्यावरणवादी होता. मोठा शास्त्रज्ञ होता. जगातील स्नमानित नागरिक होता. अनेक शोध लावले आर्मीसाठी. उचललं त्यांना… उचललं… उचललं… या आंदोलनाशी आमची आत्मा जोडली गेलीय. आम्ही जनसंघर्षातून जन्माला आलेली माणसं आहोत. आमच्याकडे शाळा आणि पुस्तकातील ज्ञान नाहीये. आम्ही जे बोलत आहोत, ते जीवनाशी संबंधित आहे. आत्मा रडत आहे आमची. आम्ही भारताचे लोक आहोत सर… या देशाला लोकतांत्रिक राज्य बनवायचं आहे. आर्थिक आणि सामाजिक समानता आणायची आहे सर… व्यक्तीची प्रतिष्ठा वाढवायची आहे सर…
मग आजही एवढी मोठी लोकसंख्या अमानुष आयुष्य कसं जगत आहे? सर्वांच्या भल्याची गोष्ट केली गेली आहे. थोडं पाहा सर, एक मोठा वर्ग नरकाचं आयुष्य जगत आहे. जगाच्या पटलावर वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था आहे भारत. पण आत भारताची कंडिशन खराब आहे. तुम्ही एक देश, एक कायद्याची गोष्ट करता. प्रत्येक राज्यात वेगवेगळे कायदे आहेत. तुम्ही पूर्णपणे फेल आहात. मी माझी असहमती दर्शवू शकतो. बोलणार… मी बोलणार… आज माझं काळीज थरथरत आहे. माहीत नाही, खूप बोलतोय सर मी… पण म्हणतात ना, एवढं तोडू नका लोकांना. कमजोर करू नका.
कोण आहे मोहम्मद इरफान?
मोहम्मद इरफान दिल्लीच्या झोपडपट्टीत राहतो. माती आणि पत्र्याचं त्याचं अत्यंत छोटं घर आहे. त्याचीही पडझड झालीय. घरात आठराविश्व दारिद्रय आहे. कोणी पाहुणा आला तर त्याची उठबस करता येईल, एवढीही त्याची ऐपत नाहीये. तो ठेला लावून कुटुंबाची गुजराण करतो. त्याला केवळ 500 रुपये मिळतात. मोहम्मदचं शिक्षण कमी झालंय. पण त्याला जगाची माहिती आहे. मोबाईलवरून तो नेहमी माहिती सर्च करत असतो. जगात काय घडतं याची माहिती ठेवत असतो. त्याच्यावर भगत सिंगाचा प्रभाव आहे. गांधीवादी अहिंसेवर त्याचा विश्वास आहे. दुष्यंत कुमार आणि अदम गोंडवी यांच्या कविता तो वाचत असतो. तो कोणत्याही विद्यार्थी संघटना किंवा राजकीय पक्षाशी संबंधित नाहीये.
